मुंबई/प्रतिनिधी
राज्याचा कारभार ज्या ठिकाणाहून चालतो त्या मंत्रालयातच दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षाकडून ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. मंत्रालयात कडेकोट सुरक्षा तपासणी होत असतानाही या बाटल्या येतात कशा असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. हे काही नवीन नाही. मंदिर बंद ठेवून बार सुरू करणं हे सरकारचं धोरणच आहे. त्यामुळे त्यात काहीच नवीन नाीही, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.
सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा टोला लगावला. यावेळी त्यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. १५ वर्ष सत्ता असताना ज्यांनी धनगर आरक्षण दिलं नाही, त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर उगाच टीका करू नये. फडणवीसांनी जोपर्यंत धनगरांना आरक्षण देत नाही तोपर्यंत आदिवासींना ज्या सवलती आहेत त्या सगळ्या सवलती धनगरांना लागू केल्या होत्या. त्यामुळे आता या सरकारने धनगर आरक्षणासंदर्भात भूमिका घ्यावी, असं आवाहन खोत यांनी केलं.
दरम्यान, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील महाविकासाआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, यावेळी त्यांनी मंत्रालयातच दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडणे हे महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारी ही घटना आहे, असे म्हणत दरेकर यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी देखील केली आहे.