नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
काँग्रेस नेते राहुल गांधी देशातील कोरोना स्थितीवरून वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधत असतात. आज देखील राहुल गांधी यांनी लसीकरण मोहीम आणि ‘मन की बात’ याची सांगड घालत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्वीटच्या माध्यमातून हल्ला चढवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी यांनी आज, रविवारी ‘ मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. यासंबंधीच राहुल गांधी यांनी दोन ओळींचे पण मार्मिक असे ट्वीट करत मोदी सरकारवर टीकेचे झोड उठवली आहे. ”फक्त प्रत्येक देशवासियांपर्यंत लस पोहचवा, मग हवं तर मन की बात पण सांगा!”असं राहुल गांधी यांनी आज ट्विटद्वारे म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ११ वाजता ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना लसींचे दोन्ही डोस घेणं गरजेचं असल्याचे सांगितलं. त्याचसोबत त्यांनी टोकियो ऑलिंपिकसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देखील दिल्या. तसेच त्यांनी साताऱ्यातील प्रवीण जाधव या खेळाडूचे ऑलिंपिक निवडीबद्दल कौतुक केलं. टोकियोला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा संघर्ष आहे. या खेळाडूंना भारताचा गौरव वाढवायचा आहे. म्हणूनच मी देशवासियांना सांगू इच्छितो, की या खेळाडूंवर आपण दबाव न आणता त्यांना खुल्या मनाने पाठिंबा द्या, असे देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यासोबतच त्यांनी मिल्का सिंग यांचं स्मरण केलं.