पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही : मच्छीमार संघटनांशी केली चर्चा
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ातील मच्छीमारांच्या सर्व समस्या मार्गी लावण्यास कटिबद्ध असून त्यांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी काम करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या जुन्या सभागृहात मच्छीमार संघटनांशी पालकमंत्री सामंत यांनी चर्चा केली.
एलईडी मासेमारी बंद झालीच पाहिजे, असे सांगून पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले की, एलईडी मासेमारी करणाऱयांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी माझी ठाम भूमिका आहे. मच्छीमाराना दिल्या जाणाऱया डिझेल परताव्याविषयी लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. सध्याच्या परिस्थितीत मच्छीमार अडचणीत आले आहेत. त्यांना सर्व मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहे. सर्व प्रकारची मासेमारी शासनाच्या नियमानुसारच झाली पाहिजे. मासे विक्रीसाठी बाजारपेठेबाबत संबंधित नगरपालिका प्रशासन निर्णय घेईल. पण, त्यासाठी मच्छीमार सोसायटय़ांनी थोडे थांबावे. क्रियाशील मच्छीमार व सोसायटी सभासद याविषयी शासनाला विनंती करण्यात येईल. क्रियाशील मच्छीमारांची व्याख्या निश्चित करण्यासाठीही शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील. पर्यटन व्यावसायिकांना कर्जाबाबत काही सवलत देण्याबाबत लीड बँकेच्या बैठकीत चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, मत्स्य आयुक्त आदी उपस्थित होते. मालवण
पालकमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला जिह्यातील जगन्नाथ कोयंडे, ज्ञानेश्वर खवळे, विनायक प्रभू (देवगड), विष्णू मोंडकर, महेश सावजी, दिलीप घारे, मेघनाथ धुरी, मनीषा जाधव, बाबी जोगी, हरी खोबरेकर, रविकिरण तोरसकर, कांचन चोपडेकर, (मालवण), गोविंद केळुसकर, अनंत केळुसकर, राजेंद्र कुबल, शिवा नाईक (वेंगुर्ले), अशोक सारंग (कुडाळ निवती) उपस्थित होते.