वेंगुर्ले – प्रतिनिधी–
वेंगुर्ले मठ कुडाळ तिठा ते गवळदेव मंदिर कुडाळ पर्यंतच्या राज्य मार्गाची अतिशय दुर्दशा झाली असून याबाबत जनतेच्या हिताच्या दृष्टीने पुढील दिशा ठरविण्यासाठी वाडीवरवडे येथील हरिओम मंगल कार्यालय येथे सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली.या बैठकीतसार्वजनिक बांधकाम सावंतवाडी चे कार्यकारी अभियंता यांना घेरावा घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
मठ कुडाळतिठा ते गवळदेव मंदिर कुडाळ पर्यंतच्या राज्य मार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली असून वेंगुर्ले शहर, मठ, आडेली, वेतोरे, पालकरवाडी, वाडीवरवडे, पिंगुळी व कुडाळ शहरामधील तसेच अन्य भागातील सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होत आहे.सदर रस्त्याची झालेली दुर्दशा, चाळण, वाताहत व गंभीर परिस्थिती पाहता प्रत्येक नागरिक मठ ते पिंगुळी या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहतूक प्रवास करताना जीव मुठीत धरून ये-जा करीत आहे.
याबाबत वाडीवरवडे येथे सर्वपक्षीय बैठक घेऊन महत्वाचे ५ ठराव घेण्यात आले. यामध्ये सोमवारी कार्यकारी अभियंता सावंतवाडी यांना घेराव घालून जाब विचारण्यात येणार आहे.पुढील ४ दिवसात जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, खासदार, पालकमंत्री, तिन्ही आमदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.गरज पडल्यास वेंगुर्ले कुडाळ सीमारेषेवर रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या घरातील सर्व कुटुंबातील व्यक्ती व मुलाबाळांसहित १ किमी लांबीचा रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्राम सभा घेऊन निषेधाचा ठराव सर्वानुमते संमत करून त्याची प्रत राज्यपाल यांना पाठविण्यात येणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग, कुडाळ – सावंतवाडी यांच्या निष्काळजीपणामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत सुधारणा न झाल्यास हायकोर्ट मध्ये याचिका दाखल करण्यात येणार आहे, आदी ठराव यावेळी घेण्यात आले.