प्रतिनिधी / मडगांव
मडगावच्या रस्सा आमलेट गाडा व्यवसायाचे प्रणेते अशोक आत्माराम नाईक यांचे शुक्रवारी कोंब -मडगाव येथे निधन झाले. ते 62 वर्षाचे होते.
त्यांच्यामागे पत्नी अर्चना, पूत्र सागर, सून सिमरन तसेच नातवंडे असा परिवार आहे. आज शनिवारी सकाळी 10 वाजता मडगाव स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
1978 साली त्यांनी मडगावच्या पालिका बागेच्या फुटपाथवर रस्सा आमलेट विकण्याचा व्यवसाय सुरु केला होता. खवय्यांच्या प्रतिसादाने 1980 मध्ये त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजुला नवीन गाडा टाकून तेथे आमलेट, चिकन, मटण असे पदार्थ देण्यास सुरुवात केली होती.
मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी अशोक नाईक यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना अशोक नाईक यांच्यामुळेच मडगावात रस्सा आमलेट गाडेवाल्यांना एक वेगळे स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्या गाडय़ावरील पदार्थ खाण्यासाठी पणजी तसेच गोव्याच्या इतर भागातूनही मंत्री, आमदार, कलाकार तसेच इतर लोक येत असत. त्यांच्या पदार्थाना भरपूर मागणी होती आणि हे सर्व पदार्थ संपवून ते घरी जायचे. नव्या पिढीत रस्सा आमलेटची क्रेझ निर्माण करण्याचे श्रेय अशोक नाईक यांना जाते असे आमदार कामत यानीं म्हटलेले आहे.