आळसंद / वार्ताहर
मतदारसंघातील राहिलेल्या गावांना टेंभु योजनेचे पाणी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला आहे. शेतीच्या पाण्यापासून मतदारसंघातील एकही गाव वंचित राहणार नाही. तर शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न लवकरच मिटणार असून गावाबरोबर वाडी वस्तीवर सुध्दा शुद्ध पाणी मिळाले पाहिजे, विकासाच्या दृष्टीने गट-तट विसरून एकत्र आले पाहिजे, खंबाळे गावच्या विकासात रविंद्र निकम याचे काम मोलाचे असून हे गाव देश पातळीवर लौकिक मिळवेल, असे प्रतिपादन आमदार अनिल बाबर यांनी केले.
खानापूर तालुक्यातील खंबाळे (भा) येथे रविंद्र निकम यांनी 17 लाख रुपये स्वखर्चाने बांधून दिलेल्या ग्रामपंचायत सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी व 25/15 अंर्तगत वीस लाख रुपयांच्या रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते यावेळी मनीषा बागल, महावीर शिंदे, सुलभा अदाटे, निलम सकटे, लक्ष्मण शिरतोडे, संजय जाधव, रविंद्र निकम, विजय सुर्वे उपस्थित होते.
यावेळी आमदार बाबर म्हणाले की, गावचा विकास करताना गट-तट विसरून एकत्र आले, तरच गावचा विकास होतो. असेच काम रविंद्र निकम यांनी केले आहे. पाठीवर विकासाची थाप पडली की, नव्या कामाची उर्मी तयार होते. गावांनी विकासाच्या संकल्पना राबविल्या पाहिजेत. गावाला चांगल्या परंपरा असाव्यात, त्या परंपरा निकम कुटुंबाने राबविल्या आहेत. मतदारसंघातील विकासाच्या दृष्टीने शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मिटणार असून शेतीला पुरेशा दाबाने वीज पुरवठा मिळण्यासाठी विद्दुत उपकेंद्राची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते काम लवकरच होईल, असे आमदार बाबर यांनी सांगितले.
यावेळी जनार्धन पवार, जगन्नाथ मस्के, मोहन सुर्वे, विजय कदम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत व प्रस्ताविक अमोल सुर्वे यांनी केले.