मधमाशा मागे लागल्या की पळता भुई थोडी होते, असा अनुभव अनेकांना आहे. तथापि, याच मधमाशा नियंत्रणात आणल्या तर आपल्यासाठी आत्मनिर्भरतेचा मार्ग मोकळा करून देतात, हे भारतातील काही खेडय़ांनी दाखवून दिले आहे. शेतीच्या पारंपरिक व्यवसायाबरोबरच मधमाशी पालनातून होणाऱया मध उत्पादनामुळे या खेडय़ांची गरिबी मोठय़ा प्रमाणावर दूर झाली आहे. भारतात धान्यक्रांती, त्यानंतर हरितक्रांती, धवलक्रांती आणि आता त्यानंतर मधक्रांतीकडे शेतकरी वळत आहे. भारतीय मधाला अमेरिका तसेच युरोपियन देशांमध्ये मोठी मागणी असल्याने सरकारही मधमाशी पालनाला प्रोत्साहन देत आहे. पश्चिम बंगालमध्ये गुरुदूम, गुजरातमध्ये बनासकांटा आणि हरियाणातील यमुनानगर येथील काही गावांमध्ये मोठय़ा प्रमाणावर मधमाशी पालन होत असून शेतकऱयांच्या उत्पन्नात त्यामुळे मोठी भर पडल्याचे दिसून येते.
भारत आज जगातील पाचव्या क्रमांकाचा मध उत्पादन करणारा देश बनला आहे. गेल्या पंधरा वर्षात या उत्पादनात 242 टक्के म्हणजे साधारणतः अडीच पट वाढ झाली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात भारतातून 633 कोटी रुपयांची अर्थात 60 हजार टन नैसर्गिक मधाची निर्यात करण्यात आली. भारतातून निर्यात होणाऱया मधापैकी जास्तीत जास्त निर्यात अमेरिका, संयुक्त अरब अमिरात व युरोपातील काही देशांना होते.
मधामध्ये रोगप्रतिकारशक्ती असल्याचे आधुनिक विज्ञानही मान्य करते. मध पौष्टिक साखरेचा एक महत्त्वाचा स्रोत असून सौंदर्य प्रसाधने व धार्मिक कार्यातही त्याचा वापर केला जातो. अनेक आयुर्वेदिक औषधे मधातून घेण्याची प्रथा आहे. याशिवाय पाव, केक, बिस्किटे आदी पदार्थांबरोबरच मधाचे सेवन केले जाते. भारतातही मधाची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढत आहे.
मधमाशी पालनाचे दुहेरी फायदे आहेत. पहिला फायदा मधाचे उत्पादन हा आहे. तर दुसरा फायदा वेगाने होणाऱया परागीभवनाचा आहे. अन्नधान्यांच्या रोपांचे परागकण मधमाशांच्या पायांना लागून त्यांचा प्रसार रोपांवर होतो. त्यामुळे परागीभवन वेगाने होऊन शेतीचे उत्पादनही वाढते, असा शेतकऱयांचा अनुभव आहे. केवळ 20 ते 30 हजार रुपयांच्या प्रारंभिक भांडवलावर हा व्यवसाय सुरू करता येतो आणि त्यातून तीन-चार वर्षात लाखो रुपयांची कमाई होऊ शकते, असे अनुभवी लोकांचे मत आहे. अर्थात कुठल्याही व्यवसायामध्ये जी दक्षता घ्यावी लागते त्यापेक्षा अधिक दक्षता या व्यवसायात घ्यावी लागते आणि मधमाशांच्या प्रकृतीची काळजी हा या दक्षतेचा सर्वात प्रमुख भाग आहे.