- ग्राम पंचायतीकडून ‘नो व्हॅक्सिन नो राशन’ चा आदेश
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही वाढताना दिसत आहे. रुग्ण संख्या रोखण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू आहे. असे असले तरी अजूनही काही भागात लसीकरणाबाबत भीती, संभ्रम दिसून येत असल्याने नागरिकांनी या मोहिमेकडे पाठ फिरवली आहे. मध्य प्रदेशातील एका गावात देखील हीच परिस्थिती दिसून आली. त्यानंतर गावाच्या ग्रामपंचायतीने अशी शक्कल लढवली की, गावात लसीकरणासाठी लांबच्या लांब रांगा लावल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूर जिल्ह्यातील शिहोदा पंचायत शाहपूर ब्लॉकच्या अंतर्गत येते. ही पंचायत जबलपूर शहरापासून जवळपास 30 किलो मीटर अंतरावर आहे. इथे राहत असलेल्या गावातील अनेक लोक लसीकरणापासून दूर पळत होते. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीने एक आदेश जारी केला आहे. या आदेशात त्यांनी म्हटले आहे की, जे नागरिक लस टोचून घेण्यासाठी येणार नाहीत त्या नागरिकांना पब्लिक डिस्ट्रीब्यूशन शॉप्स म्हणजेच पीडीएस मधून रेशन दिले जाणार नाही. एवढेच नाही तर ग्राम पंचायतीने असे देखील सांगितले आहे की, येथील रहिवाशांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना पहिल्यांदा लस टोचून घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, सरकारच्या या आदेशाकडे नागरिकांनी पहिल्यांदा दुर्लक्ष केले मात्र, काही काळातच या आदेशाचा सकारात्मक प्रतिसाद दिसून आला. सद्य परिस्थितीत गावातील 85 % नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणाचे वाढलेले हे प्रमाण पाहून आजूबाजूच्या ग्राम पंचायत देखील असा आदेश जारी करण्याच्या विचारात आहेत.