जिल्हाधिकाऱयांना निवेदन, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली नसल्याचा आरोप
बेळगाव
महापालिका निवडणुकीच्या निकालाबाबत उमेदवार समाधानी नसल्याचे दिसून आले आहे. सदर निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅटचा वापर केला नाही. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तरी सदर निवडणूक प्रक्रिया रद्द करून व्हीव्हीपॅटच्या साहाय्याने निवडणूक घ्यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना सोमवारी रात्री देण्यात आले.
महापालिका निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. दि. 3 सप्टेंबर रोजी महापालिकेच्या 58 जागांसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीचा निकाल सोमवार दि. 6 रोजी लागला. पण मतदानावेळी इव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट मशीन जोडणे गरजेचे होते. पण ही प्रक्रिया न करताच निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. निवडणुकीत पारदर्शकता राहण्यासाठी इव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट मशीन जोडणे बंधनकारक आहे. असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 2013 मध्ये दिला होता. मात्र राज्य निवडणूक आयोगाने या आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे ही प्रक्रिया पारदर्शी झाली नसल्याचा आरोप करण्यात आला . बहुतांश उमेदवारांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन निवडणूक प्रक्रियेबाबत आक्षेप घेतला आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी दि. 31 ऑगस्ट रोजी निवेदन देऊन निवडणूक प्रक्रियेबाबत तक्रार करण्यात आली होती. महापालिका निवडणुकीत व्हीव्हीपॅटचाचा वापर करण्यात यावा अशी मागणी केली होती. पण याकडे जिल्हाधिकाऱयांसह निवडणूक अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले होते. तसेच सदर निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर केला नसल्याने ही प्रक्रिया पारदर्शी झाली नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन झाले आहे. सदर निवडणूक प्रक्रिया रद्द करावी आणि महापालिका निवडणूक व्हीव्हीपॅटच्या सहकार्याने पुन्हा नव्याने घेण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले आहे. सदर निवेदन सोमवारी रात्री उशिरा सर्व उमेदवारांच्यावतीने देण्यात आले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी स्वीकारले. यावेळी निवडणूक रिंगणातील उमेदवार मोठय़ा संख्येने उपस्थित होते.