अध्याय एकोणीसावा
भगवंत म्हणाले, भक्त आवडीने माझे भजन करू लागला म्हणजे भोगाची आठवणच तो विसरतो. खरा भक्त माझ्या प्राप्तीसाठी क्षणही वाया जाऊ देत नाही.
माझ्या प्राप्तीच्याच उद्देशाने कर्मे करतो. मोठमोठाली व्रते व नेम सारे माझ्यासाठीच तो करत असतो. गायत्री आदिकरून मंत्रांचा जप करतो. दुर्धर तप आचरण करतो. मी विश्वंभर सर्वव्यापी व सर्वतोमुखी असल्यामुळे तो गोरगरिबांना अन्नदान करतो. माझे आवाहन करून तो करत असलेले भोजन मलाच अर्पण करतो. प्रत्येक घासाघासाला हरीचे स्मरण केले म्हणजे ते अन्नच पूर्ण ब्रह्म होते. अशा रीतीने माझे भक्त आपण होऊनच आपले सारे कर्म मला अर्पण करतात. उद्धवा अशा रीतीने सदासर्वदा जे लोक या धर्माचे पालन करून मला समर्पित होतात, त्यांच्या हृदयामध्ये माझ्या भक्तीचा उदय होतो मग त्याला आणखी काही मिळायचे शिल्लकच रहात नाही. लोखंड कमावून त्यावर उत्तम झिलई आणली, तर त्याचा आरसा होतो. त्याचप्रमाणे सारी कर्मे मलाच अर्पण केली म्हणजे मनही शुद्ध होते. सोन्याला जो जो पुटात घालावे तो तो त्याला अधिकाअधिकच तेज चढते किंवा वस्त्र धूत गेले असता तेही अधिक स्वच्छ होत जाते त्याप्रमाणे सारी कर्मे मला अर्पण केली, म्हणजे मनही निर्मळ होते आणि मन शुद्ध झाले की, लगेच ते माझ्या स्वरूपातच अर्पण होऊ लागते. नद्यांमध्ये पुराचे पाणी येऊन भरले, म्हणजे त्या फोफावत जाऊन समुद्राला मिळतात, त्याप्रमाणे मन निर्मळ झाले की, तेही मत्स्वरूपालाच येऊन मिळते. माझ्या स्वरूपात मन स्थिर होते, त्यावेळी आर्त, जिज्ञासु अर्थार्थी हे तिन्ही प्रकार नाहीसे होऊन चौथी भक्तीच तेथे प्रकट होते. खरं म्हणजे माझी भक्ती हे एकच भांडवल माझ्या प्राप्तीसाठी पुरेसे आहे. त्यात दुसरी, तिसरी, चौथी असे प्रकार आहेत असे समजणे ही निव्वळ भ्रांती आहे. कारण माझ्या दृष्टीने एकच भक्ती आहे. तीच माझी श्रे÷ भक्ती होय. सर्व गोष्टी मला अर्पण करणे या एका साधनाने ती प्राप्त होते. ब्रह्मदेव, शंकर, सनकादिक अशी भक्ती करून स्वतःला माझे भक्त म्हणवत असतात. सर्व गोष्टी मला अर्पण करण्याची मनाची तयारी होण्यासाठी अहंकार निखालस नाहीसा व्हावा लागतो. सर्व काही तुझंच आहे आणि मी ते तुला अर्पण करत आहे अशा भावनेनं साधक वावरू लागला की, सारे प्राणिमात्र त्याला आत्मस्वरूपच दिसू लागतात. हीच माझी सहजस्थिती होय. उद्धवा! माझ्या स्वरूपाच्या सहजस्थितीचे ज्ञान झाले की, माझी श्रे÷ भक्ती फलद्रुप झाली असे म्हणता येईल. या श्रे÷ भक्तीचा एक अंश प्राप्त झाला तरी आर्त जिज्ञासू व अर्थार्थी हे सज्ञान होऊन वागत असतात. ते खरे साधक होऊन निजस्वार्थ साधतात. हीच भक्ती आर्ताच्या ठिकाणी परमार्थाविषयी पराकोटीची तळमळ उत्पन्न करते. मग ‘आर्त’ ह्या नावाला नवाच अर्थ लागतो. भक्ताच्या मनाची आर्तता माझ्या मनात प्रकटते कारण मनामध्ये भगवत्प्राप्तीची तीव्र व्यथा उत्पन्न होणे याचेच नांव परमार्थातील ‘आर्तता’ होय. जो भगवंताच्या प्राप्तीसाठी कडय़ावरून उडी घालायलासुद्धा धावतो, किंवा जळत्या आगीतसुद्धा शिरू पाहतो, त्यालाच खरोखर ‘आर्त’ असे म्हणतात. आर्ताची स्थिती अशी असते परंतु जिज्ञासु तशा साहसाचे निराकरण करतो. तो म्हणतो, मनुष्यदेह हा ब्रह्मप्राप्तीसाठी आहे. त्याचा आत्महत्येने नाश करणे योग्य नाही. म्हणून तो पूर्वीच्या भक्तांनी कोणत्या रीतीने भगवद्भक्ति संपादन केली, ती रीत जाणून घेऊन जीवाभावाने त्या युक्तीचे विवरण करतो व त्याप्रमाणे वागतो. मला जाणण्याची अशी जी उत्कट इच्छा तिलाच खरी ‘जिज्ञासा’ म्हणतात. तीच माझ्या स्वरूपाला प्रकाशित करते आणि त्या प्रकाशात भक्ताला माझे दर्शन घडते. परब्रह्मास पोचावयाच्या युक्तीचा जो ठसा, त्याचेच नाव ‘शुद्ध-जिज्ञासा’ होय. वेदशास्त्राच्या अर्थ ज्ञानासंबंधाने जी खटपट केली जाते, तिला ‘लौकिक जिज्ञासा’ असे नाव आहे. तसेच प्रत्येक अर्थामध्ये माझेच मागणे अथवा मला शोधणे याचे नांव ‘शुद्ध अर्थार्थी’ हे लक्षात ठेव.
क्रमशः