109 जागांवर तृणमूलवर मात करण्याची योजना
कोलकाता प्रेसिडेन्सी एरिया म्हणजेच ग्रेटर कोलकाता म्हणजेच पश्चिम बंगालचे दक्षिण क्षेत्र ममता बॅनर्जींचा मजबूत बालेकिल्ला राहिला आहे. सत्तेच्या कुलुपाची चावी येथेच असल्याचे मानले जात आहे. तिसऱया टप्प्यात या क्षेत्रातील एका हिस्स्यात मतदान झाले आहे. हा बालेकिल्ला शाबूत ठेवणे ममता बॅनर्जींसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. तर भाजपने येथे अत्यंत हुशारीने स्वतःचे बळ वाढविले आहे. मागील 4-5 महिन्यांपासून भाजपचे 22 वरिष्ठ नेते केवळ याच भागातील 109 मतदारसंघांमध्ये पक्षाचे काम करत आहेत. तळागाळातील संघटना दुरुस्त करण्यापासून भयाचे वातावरण संपविणे आणि उमेदवार सतेच मतदारांना सुरक्षा देण्यापर्यंतची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यांवर घेतली आहे.
पूर्ण देशात केवळ बंगालमध्येच हिंसामुक्त निवडणूक होऊ शकलेली नाही. येथील निवडणुकीत नेहमीच भयाचे सावट असते. निवडणूक आयोग आणि निमलष्करी दलांच्या प्रयत्नानंतरही मतदारच नव्हे तर उमेदवारांनाही घाबरविण्याचे-धमकाविण्याच्या कारवाया सुरू आहेत. अशा स्थितीत विशेषकरून या क्षेत्रात भाजपच्या मायक्रो मॅनेजमेंटमध्ये काहीसा बदल झाला आहे. येथील मॅनेजमेंट केवळ संघटनात्मक नव्हे तर विश्वास निर्माण करण्यावर अधिक टिकलेले आहे.
दिग्गज नेत्यांना प्रभारीपद
माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, आर.के. सिंग, महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे, विनय सहस्त्रबुद्धे यासारख्या नेत्यांकडे प्रत्येकी 5 विधानसभा मतदारसंघ सोपविण्यात आले आहेत. तर उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यासारख्या काही नेत्यांना 25-35 मतदारसंघांचा प्रभारी करण्यात आले आहे. प्रत्येक मतदारसंघात प्रभावी प्रचाराच्या उद्देशानेही वरिष्ठ नेत्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
समन्वयासह सुरक्षेबद्दल हमी
या नेत्यांना प्रत्येक स्तरावर समन्वयासह क्षेत्रात सुरक्षेवरून विश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने पावले उचलावी लागत आहेत. सात्याने केंद्रीय निवडणूक पर्यवेक्षकाशी चर्चा करण्याची जबाबदारीही या भाजप नेत्यांना देण्यात आली आहे. या नेत्यांकडे स्थानिक गुंडगिरीच्या तक्रारी पोहोचल्यावर त्यांचे निवारण होईल याकडे त्यांचे लक्ष असते. या क्षेत्रातील बहुतांश मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच निमलष्करी दलांचे संचलन होत असून याद्वारे मतदारांमध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. प्रचारसभांसह स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरी नेत्यांच्या रोड शोवर भर देण्यात आहे. रोड शोमुळे अधिक प्रमाणात थेट संपर्क होण्यासह रस्ते आणि गल्ल्यांदरम्यान चालणाऱया ताफ्यामुळे विश्वास निर्माण होत असल्याचे मानले जात आहे. बंगालचे मॅनेजमेंट यशस्वी ठरल्यास आगामी काळात भाजपच्या प्रचारमोहिमेत याची पुनरावृत्ती दिसून येऊ शकते.