लवकरच हटणार बँडेज
मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या पायाची ईजा आता बरी झाली आहे. लवकरच त्या पायावरील बँडेज हटविणार आहेत. माझा पाय आता बरा आहे, प्रचारामुळे सातत्याने बाहेर असल्याने कोलकात्यात परतल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बँडेज हटविणार असल्याचे ममतांनी बहरमपूर येथील प्रचारसभेत बोलताना म्हटले आहे.
नंदीग्राममध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर ममता बॅनर्जी जनसंपर्कादरम्यान जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. दोन-तीन दिवस भरती राहिल्यावर त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. पण निवडणुकीमुळे त्या सातत्याने व्हिलचेअरवरून प्रचार करत आहेत. प्रचार करता येऊ नये म्हणून जाणूनबुजून माझ्या पायाला ईजा करण्यात आल्याचा आरोप ममतांनी केला होता. त्यांनी भाजप आणि नंदीग्राममधील भाजप उमेदवार शुभेंदु अधिकारी यांच्यावर आरोप केला होता.
निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्या जखमी होण्याच्या घटनेची गंभीर दखल घेतली होती. नंदीग्रामचे पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकाऱयांसह मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा संचालकाला पदावरून हटविले होते. ममता बॅनर्जी यांच्यारव हल्ला झाल्याचा आरोपही निवडणूक आयोगाने फेटाळला होता. ममता बॅनर्जी प्रचारादरम्यान जखमी झाल्याचे आयोगाने म्हटले होते.