हे तर नाटक असल्याचा भाजपचा आरोप, तृणमूल सदस्य निवडणूक आयोगाकडे
कोलकाता / वृत्तसंस्था
बुधवारी ममता बॅनर्जी यांना नंदीग्राम येथे झालेल्या अपघातावरून आता पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापले आहे. हा अपघात नसून घातपातच आहे असा आरोप तृणमूल काँगेसने केला असून त्या विरोधात कोलकत्यात शांती मोर्चाही या पक्षाने काढला. मात्र भारतीय जनता पक्षाने हा पराभव टाळण्यासाठी रचलेला बनाव असल्याचा आरोप केला आहे. तसेच जनता असल्या नाटकांना भुलणार नाही, अशही टिप्पणी या पक्षाच्या अनेक नेत्यांनी शुक्रवारी केली.
तृणमूल काँगेसच्या सहा खासदारांनी शुक्रवारी दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यांनी आयोगाला निवेदन देऊन ममता बॅनर्जींना संपवण्याचे कारस्थान केले जात असल्याचा आरोप केला. मात्र, निवडणूक आयोगाने गुरूवारीच तृणमूलचे सर्व आरोप नाकारले असून या पक्षाच्या पहिल्या निवेदनाला सविस्तर आणि खरमरीत उत्तर दिले. निवडणूक आयोगाने राज्याची कायदा सुव्यवस्था स्वतःच्या हाती घेतली नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्यामुळे राज्याची कायदा सुव्यवस्था राखण्याचे उत्तरदायित्व राज्य सरकारचेच असून झाल्या प्रसंगाला राज्याची पोलीस यंत्रणाच जबाबदार आहे, असे ठणकावले आहे.
नेमके काय घडले
ममता बॅनर्जींच्या संदर्भात घडलेली घटना ही घातपात नसून अपघातच आहे हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. बॅनर्जी यांनी प्रथम हा आपल्यावरील हल्ला असल्याचे म्हटले होते. तथापि, सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्थानिकांनी मोबाईलवरून केलेले चित्रण यावरून हा अपघातच होता हे दिसत आहे. तरीही तृणमूलचे कार्यकर्ते हा हल्लाच असल्याचे सांगत आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाकडून या चित्रफिती राज्यात जागोजागी दाखविल्या जात आहेत.
ममता बॅनर्जींना डिस्चार्ज
बुधवारी संध्याकाळी कोलकत्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ममता बॅनर्जींना शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता घरी पाठविण्यात आले. त्या व्हीलचेअरवरून रूग्णालयाबाहेर आल्या. आपली प्रकृती ठीक असून आपण पुढचा प्रचार व्हीलचेअरवरून करू असे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले. राज्यात ाशंतता राखण्याचा संदेशही त्यांनी दिला. त्या कदाचित रविवारपासून पुन्हा प्रचाराला सुरवात करतील अशी शक्यता तृणमूलकडून व्यक्त केली जात आहे.