ऑनलाईन टीम / पुणे :
रणात मराठयांनी इतिहास घडविला, दिल्लीवरती भगवा झेंडा फडकविला… अशा शब्दांत मराठा वीरांचा जयजयकार करीत भव्य रंगावली, मर्दानी खेळ, शस्त्र व ध्वजपूजनातून पानिपतवीरांना अभिवादन करण्यात आले. पानिपत ही मराठयांची व्यथा नाही, तर आमची शौर्यगाथा आहे, असे अभिमानाने सांगत पानिपत युद्धातील वीरांना व पानिपतवीर श्रीमंत महाराजा यशवंतराव पवार यांचे त्यांच्या वंशजांनी नमन केले.
श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र तर्फे मराठा शौर्य दिनानिमित्त लालमहाल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मलठण संस्थाचे उदयसिंह पवार, नंदुरबार तळोदा संस्थानचे जहागिरदार अमरजीत बारगळ, महावितरण ग्रामीणचे अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार, अनिल पवार, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर पवार, शेखर पवार, अध्यक्ष सागरदादा पवार, रितेश पवार, बाबाकाका पवार, ऊमेश वैद्य, विठ्ठल पवार, श्रीकांत पवार, विजय पवार, राजेश पवार, सुनिल पवार, गजानन पवार, सुजित पवार, सिंधान्त नातू,सचिन पवार, राजेश पवार, सिध्दांन्त नातू, तुषार पवार आदी उपस्थित होते. रंगावलीकार संदीप ढवळे यांनी 10 बाय 15 फूट आकारातील रंगावली साकारली. तसेच रवींद्र जगदाळे व सहका-यांनी मर्दानी खेळ सादर केले. तसेच संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही झाले.
पानिपत संग्रामाविषयी बोलताना उमेश वैद्य पवार म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनंतर ख-या अर्थाने उत्तरेकडे स्वा-या मोठया प्रमाणात सुरु झाल्या. सन 1726 पासून उदयाला आलेल्या यशवंतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोहिमा आखत भगवा झेंडा अटकेपार नेण्याकरीता लढा देण्यात आला. याबद्दल त्यांना सवाई असा बहुमान देखील मिळाला. उदगीर येथील लढाईत पवार यांनी मोठा पराक्रम गाजविला होता.
सागर पवार म्हणाले, मराठयांनी केवळ मराठी साम्राज्यासाठी नव्हे, तर राष्ट्राच्या रक्षणासाठी जीवन समर्पित केले. मराठी मातीतील मुलांकडे हा राष्ट्रनिष्ठेचा संस्कार वारश्यानेच आला आहे. आजही अनेक मराठी तरुण देशासाठी लढण्याकरीता सज्ज असतात, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात कोरोना काळात कार्य केलेले पोलीस, मनपा कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. शेखर पवार यांनी सूत्रसंचालन केले. चैतन्य पवार यांनी आभार मानले.