प्रतिनिधी/नाशिक
94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार असल्याचे निश्चित झाले आहे. साहित्य मंडळाच्या स्थळपाहणी समितीने सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. यासाठी गुरुवारी नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटी परिसराची पाहणी त्यांनी केली. आता शुक्रवारी औरंगाबादला होणाऱया बैठकीनंतर घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी नाशिक आणि नवी दिल्लीचे प्रस्ताव आहेत. सार्वजनिक वाचनालय आणि लोकहितवादी मंडळ यांनी नाशिकमधून प्रस्ताव दिले आहेत. त्यानंतर आयोजन समितीने स्थळपाहणी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पाहणी समितीही नियुक्त करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे आदी सदस्य स्थळपाहणी दौऱयात नाशिकमध्ये आले. सदस्यांनी गोखले एज्यूकेशन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसराची पाहणी करून आढावा घेतला. निवासाची व्यवस्था, ग्रंथालयात काय व्यव्यस्था आहे, भोजनाची व्यवस्था, संमेलनाची जवळपास किती लोकांची जागा आहे याची पाहणी केली असून सदस्य आगामी बैठकीत अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर नाशिकला संमेलन घ्यायचे कि नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र साहित्य मंडळाच्या स्थळपाहणी समितीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नाशिकला तिसऱयांदा होणार हे निश्चित होईल, असे स्पष्ट संकेत समितीच्या सदस्यांकडून पाहणी दरम्यान दिले आहेत.