पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
प्रतिनिधी / सावंतवाडी:
सततच्या पावसामुळे मळगाव घाटरस्त्यातील मोरीवजा संरक्षक भिंत कोसळली. या भिंतीची डागडुजी करण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाने केला. मात्र, तो असफल ठरल्याने आता ही मोरीवजा संरक्षक भिंत नव्याने उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारपासून आठ दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गे सावंतवाडी शहराशी असलेला तालुक्यातील 20 गावांचा तसेच वेगुर्ले तालुक्याचा संपर्क आठ दिवस तुटणार आहे. या काळात इन्सुली, आकेरी असे पर्यायी मार्ग सावंतवाडीत ये-जा करण्यासाठी वापरावेत, असे आवाहन बांधकाम विभागाने केले आहे. आठ दिवसात हा रस्ता वाहतुकीस सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अनिल आवटी यांनी सांगितले.
सावंतवाडीतून वेगुर्ले, मळेवाड भागात जाणारा रस्ता मळगाव घाटीतून जातो. रेल्वे आल्यानंतर मळगाव घाटीतील वाहतूक वाढली. त्याचा ताण घाटीतील रस्त्यावर पडू लागला आहे. त्यामुळे रस्ता वारंवार खचत असतो. सार्वजनिक बांधकाम विभाग त्याची डागडुजी करतो. परंतु ती तात्पुरती ठरते. हा रस्ता वनखात्याच्या हद्दीतून जातो. त्यामुळे रस्ता दुरुस्तीला वनखात्याचा अडथळा होतो. त्यामुळे गेली काही वर्षे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. गतवर्षी मुसळधार पावसामुळे धबधब्याच्या ठिकाणी वरील भागातून झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे डोंगर खचला आहे. डोंगर खचण्याचे संकट अद्यापही आहे. तेथे संरक्षक भित बांधणे आवश्यक आहे. तर पावसाळा सुरू झाला असताना मोरीवजा संरक्षक भिंत कोसळली. तेथे डागडुजी करण्याचा प्रयत्न बांधकाम विभागाने केला. परंतु संरक्षक भिंत अधिकच खचली. त्यामुळे डागडुजीचा प्रयत्न फसला आहे.
आता पूर्ण रस्ता खोदून तेथे नव्याने मोरीवजा संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी आठ दिवस या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. मळगाव, मळेवाड, तळवडे भाग तसेच वेंगुर्ले तालुक्यात या मार्गे होणारी वाहतूक बंद राहणार आहे. आता झाराप आणि इन्सुली रस्त्याचा पर्याय आहे. त्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मळगाव घाटीत आणखी एका ठिकाणी रस्ता खचला असून त्याचीही डागडुजी करण्यात येणार आहे. तर इन्सुली घाटीतील रस्ताही धोकादायक बनला आहे. मुसळधार पाऊस लागल्यास तोही खचण्याची भीती आहे. तेथे मोरीवाटे जाणारे पाणी अडवून रस्त्यावर सोडले आहे.