कविता बिष्टचं आयुष्य अनेकींसाठी प्रेरणादायी ठरावं. कोरोना, लॉकडाउन तसंच अन्य कारणांमुळे नैराश्य आलेल्यांना, हताश झालेल्यांना आणि आयुष्याची लढाई लढताना डगमगणार्या अनेकांना कविताचा जीवनसंघर्ष नवी उमेद मिळवून देऊ शकतो. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी कवितावर ऍसिड हल्ला झाला. तिला बराच काळ उपचारही मिळाले नाहीत. नियमांवर बोट ठेवून तिला रुग्णालयात दाखलही करून घेतलं गेलं नाही. यामुळे ती बराच काळ वेदनांनी विव्हळत होती. कविताच्या कंपनीने तिची खूप मदत केली. त्यांच्याच प्रत्यत्नांनी कविता रुग्णालयात दाखल झाली. मात्र या हल्ल्यात तिला डोळे गमवावे लागले. आज कविता 31 वर्षांची आहे आणि आयुष्यात स्थिरस्थावर आहे. डोळे गेले, चेहरा विद्रूप झाला म्हणून ती खचली नाही उलट नव्या दमाने उभी राहिली.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कविता नोकरी करण्यासाठी नोएडाला गेली. तिथेच एकतर्फी प्रेम करणार्या एका मुलाने तिच्यावर ऍसिड हल्ला केला. दोन फेब्रुवारी 2008 च्या पहाटेची ही घटना कविताला आजही अस्वस्थ करून जाते. या हल्ल्यानंतर साधारण सहा दिवस कविता बेशुद्धच होती. शुद्धीवर आल्यानंतर आपले डोळे गेल्याचं तिला कळलं. सुरूवातीला तिला धक्का बसला. मात्र नंतर या सगळ्यातून सावरायचं असं तिने ठरवलं. साधारण दोन वर्षांनी तिला दृष्टीहिन ट्रेनिंग स्कूलमधून पत्र आलं. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र बहीण आणि आईच्या प्रोत्साहनामुळे तिने या संस्थेत जाण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला तिथलं प्रशिक्षण तिच्या पचनी पडत नव्हतं. कविताचं मन रमत नव्हतं. मात्र या केंद्रात तिचं समुपदेशन करण्यात आलं. अंध व्यक्तीही आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतात याची तिला खात्री पटली आणि इथूनच कविताच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली.
कविताने देहरादूनमधल्या नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ व्हिज्युअली हँडिकॅप्ड या संस्थेत प्रवेश घेतला. इथे तिने कॉम्प्युटर चालवणं, शॉर्टहँड, मेणबत्त्या, एनव्हलप्स तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलं. यानंतर ती गावात परतली. गावात आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय शिबिरादरम्यान तिला अजून प्रोत्साहन मिळालं. कविता गावाबाहेर पडली. दरम्यानच्या काळात तिच्या बहिणीचं निधन झालं. वडिलांची नोकरी गेली. मात्र कविता खंबीर होती. 2014 मध्ये तिला निर्भया सेलमध्ये नोकरी मिळाली. यानंतर तिच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडत गेले. कविताला बरेच पुरस्कार मिळाले. तिला उत्तराखंड राज्याचा महिला पुरस्कारही मिळाला. त्यानंतर तिला राज्याच्या महिला सक्षमीकरण विभागाची ब्रँड अँबेसिडरही करण्यात आलं. आयुष्यात निराशेचे क्षण आले तरी त्यावर मात करत पुढे कसं जायचं याचे धडे कविताने घालून दिले आहेत.