बाहुबली अनंत सिंग, रीतलाल यादव यांना जबाबदारी
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहार विधानसभा निवडणुकीत बहुमत गाठण्यास अपयशी ठरल्यावरही ‘महाआघाडी’ सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तुरुंगात कैद बाहुबली अनंत सिंग याच्यासोबत गुन्हेगारी जगतातून राजकारणात येत आमदार झालेले रीतलाल यादव यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. तेजस्वी यांनी ‘महाआघाडी सरकार’ स्थापन करण्यासाठी निर्माण केलेल्या टास्क फोर्समध्ये पैसा आणि राजकारणाच्या हिशेबानेही काम देण्यात आले आहे. विरोधी पक्षापासून अपक्षांना सोबत घेण्यासाठी तेजस्वी यांनी या नेत्यांना जबाबदारी दिली आहे.
अनंत सिंग आणि रीतलाल यादव यांनी अपक्षांपासून छोटे पक्ष असलेल्यांना महाआघाडीत सामील होण्यासाठी तयार करावे, अशी राजदची इच्छा आहे. आमदार सुनील सिंग आणि खासदार अमरेंद्र धारी सिंग यांच्यावरही तेजस्वी यांनी विश्वास दाखविला आहे.
उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर
रालोआ सरकार अधिक काळ चालणार नाही असा दावा राजदच्या आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव यांनी केला आहे. तेजस्वी यांनी जाहीरपणे हमचे नेते जीतनराम मांझी आणि व्हीआयपीचे नेते मुकेश सहनी यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे.