चिपळूण
महाजनकोच्या 28 व 29 मार्चला पुकारलेल्या लाक्षणिक संपामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कोळकेवाडी धरणास कोणताही धोका पोहचू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. यादिवशी कोळकेवाडी धरणाचे वक्र दरवाजे उघडून अतिरिक्त पाणी नियंत्रितपणे बोलादवाडी नाल्याद्वारे सोडावे लागल्यास या नाल्यामध्ये पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी वाशिष्ठी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा कोयना धरण विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.
महानिर्मिती कंपनीमधील कर्मचारी संघटनांनी 28 व 29 मार्चदरम्यान 2 दिवसांचा संप पुकारला आहे. या दरम्यान कंपनीकडील कर्मचाऱयांच्या कमतरतेमुळे संप कालावधीत कोळकेवाडी धरण पायथा विद्युतगृह (कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा 3) बंद राहिल्यास धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाची वक्रद्वारे उघडण्याची व्यवस्था करण्याबाबत महानिर्मिती कंपनीमार्फत सूचना केल्या आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा 1, 2 व 4 मधून कोळकेवाडी धरणात पाणी येणे चालू राहिल्यास धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी कोळकेवाडी धरणामधून बोलादवाडी नाल्यात पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलादवाडी नाल्यामधील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
या पार्वभूमीवर बोलादवाडी नाल्यालगतच्या कोळकेवाडी, नागावे, अलोरे तसेच वशिष्टी नदीपात्रालगतच्या खडपोली, पिंपळी व चिंचघरी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. दरम्यान, दळवटणे गावापुढे वाशिष्ठी नदीपात्रामध्ये नेहमीप्रमाणे विसर्ग चालू राहणार आहे. कोळकेवाडी धरणाचे अतिरिक्त पाणी सोडल्याने बोलादवाडी नाल्याच्या काठावरील लोकांमध्ये घबराट पसरु नये, तसेच ग्रामस्थांची जीवितहानी होऊ नये किंवा मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बोलादवाडी नाला काठावर अनियमित बांधकामे किंवा अतिक्रमणे असल्यास अशा मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी शासनाची राहणार नाही याची जाणीव संबंधितांना करुन द्यावी, असेही आवाहनही केले आहे. प्रथमतः कोळकेवाडी धरणावरील सावधानतेचा इशारा म्हणून तीनवेळा भोंगा वाजवण्यात येणार आहे. त्यानंतर 2 ते 5 मिनिटांच्या कालावधीत यांत्रिकी शाखा (एम. व्ही. शेड) येथील भोंगा वाजवण्यात येईल. त्यानंतर 2 ते 5 मिनिटांच्या कालावधीत यांत्रिकी कार्यशाळा (वर्कशॉप) टी.आर.टी. नागावे ब्रीजजवळील भोंगा वाजवण्यात येईल. तसेच पाणी सोडण्यापूर्वी लाऊडस्पिकरवरुन खबरदारीचा इशारा देण्यात येईल व त्यानंतर धरणाच्या सांडव्यावरुन पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही धरण व्यवस्थापनामार्फत कळवण्यात आले आहे. तसेच वाशिष्ठी नदीपात्रात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने गाळ काढणारी यंत्रणा सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचनाही कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभाग, अलोरे यांनी केल्या आहेत.