पूर्वी आजीच्या तोंडून एक म्हण वजा सुविचार ऐकायला मिळत असे. संगति सङ्गदोषणम्… म्हणजे एखाद्याच्या हातून काही चुकीचे वागणे झाले, तर त्याचा दोष त्याची कुणाशी संगत आहे त्याला दिला जायचा. लहान वयात समवयस्क मुलांशी मैत्री होणे स्वाभाविक आहे. परंतु आपल्या मित्रमैत्रिणीला जर काही चुकीच्या गोष्टी करायच्या सवयी असतील, तर त्या वयात नकळत आपल्याकडून त्याचे अनुकरण केले जाते. मग ती सवय बनत जाते. जेव्हा सुदैवाने घरातल्या मोठय़ांच्या हे लक्षात येते आणि त्यामुळे आपले मूल भविष्यात चुकीच्या मार्गाने जाईल अशी जाणीव होते, तेव्हा प्रथम त्याच्या आजुबाजूच्या मित्रमंडळींची चौकशी केली जाते. एखादा मित्र किंवा मैत्रीण चुकीचे वागत असेल, तर त्यांची आणि पाल्याची कान उघाडणी केली जाते. अशा वागण्यामुळे आपले कसे नुकसान होणार आहे याची योग्य पद्धतीने जाणीव करून दिल्यास चुकलेले मूल पुन्हा योग्य मार्गावर येते. तो चांगल्या मुलांच्या संपर्कात राहील याचीही काळजी घेतली जाते. तुम्ही कोणत्या प्रकारच्या माणसांच्या संगतीत राहता, ह्यावरही तुमचे भवितव्य मोठय़ा प्रमाणात अवलंबून असते. म्हणून नेहमी सत्संगती धरावी. यासंबंधीचा एक संस्कृत श्लोक पाहूया.
महाजनस्य संसर्गः कस्य नोन्नतिकारकः।पद्मपत्रस्थितं तोयं धत्ते मुक्ताफलश्रियम्।। अर्थ- सज्जनांची संगती कोणाला बरे उन्नतीकारक होणार नाही? ज्याप्रमाणे कमळाच्या पानावर पडलेला पाण्याचा थेंब मोत्यांची शोभा धारण करते! एरवी पाण्याचा थेंब जमिनीवर पडला, तर तो मातीत जिरून जातो. त्याचा मागमूसही रहात नाही. पण तोच थेंब सुंदर अशा कमलपत्रावर पडला तर मोत्यासारखा चमकतो. त्याची लोक प्रशंसा करतात. कवींच्या काव्याचा तो विषय होतो. थोडक्मयात थोर लोकांच्या, सज्जन लोकांच्या संगतीत आलेला कुणीही त्यांचे गुण नकळत उचलतो. म्हणूनच वाटमारी करणारा वाल्याकोळी नारदमुनींच्या संपर्कात आल्यावर वाल्मिकी मुनी झाला. महाकवी होऊन रामायणासारखा अजोड ग्रंथ लिहिला. अशा ह्या सज्जन संगतीचे महात्म्य सांगणारा आणखी एक श्लोक आहे. चंदनं शीतलं लोके चंदनादपि चंद्रमा।चंद्रचंदनयोर्मध्ये शीतला साधुसंगतिः।।
अर्थ:-जगात चंदन शीतल आहे, चंदनापेक्षाही चंद्र अधिक शीतल आहे. पण चंद्र आणि चंदन यांच्यापेक्षा सज्जनांची संगत ही अधिक शीतल आहे. इथे शीतल म्हणजे आल्हाददायक असा अर्थ आहे. चंदन, चंद्र हे नेहमीच आपल्या तनामनाला आल्हाद देणारे असतात. पण सज्जनांची संगत ही आपले पूर्ण जीवन आल्हाददायक बनवते.
थोडक्मयात सुसंगती सदा घडो, सुजनवाक्मय कानी पडो। कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो