कोल्हापूर/प्रतिनिधी
उत्तरच्या पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवसात घराघरात महात्मा गांधी पोहोचतील. पण त्याचा देखील काही उपयोग होणार नाही. जर तसा प्रयत्न केल्यास आम्ही तो हाणून पाडू. असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत भाजपने आघाडी घेतली आहे. या निवडणुकीला आम्ही विकासाच्या दिशेने घेऊन जात आहोत. मात्र महाविकास आघाडी सरकारने ही निवडणूक वैयक्तिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. पेटीएमच्या माध्यमातून पैसे वाटण्याचा प्रयत्न करत आहेत. पण नागरिकांना आवाहन करतो की, एक हजारांसाठी नको ते शुक्लकाष्ट मागे लागून घेऊ नका. एक हजार रुपये अशा पद्धतीने वाटले तर विरोधकांच्यावर ईडीची कारवाई होऊ शकते. आज याबाबत ईडीकडे तक्रार केली जाणार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
आघाडीकडून सरकारी अधिकाऱ्यांचा गैरवापर सुरू आहे. आम्ही ते सहन करणार नाही. असा इशाराही पाटील यांनी दिला आहे. माझ्यावर टीका होत असली तरी या बद्दल मला काही बोलायचं नाही. पण माझ्यावर टीका करण्याचे कारण म्हणजे सर्वसामान्य घरातील मुलगा मोठा होतो हे त्यांना सहन होत नाही. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले आहेत. अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.