प्रतिनिधी/ चिपळूण
महापुरामुळे बाजारपेठेतील व्यापारी उद्ध्वस्त झाले आहेत. त्या मानाने शासनाने जाहीर केलेली मदत फारच तोकडी असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या मदतीवर उभारी कशी घ्यायची, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. शासनाने याचा फेरविचार करण्याची मागणी होत आहे.
काही दिवसांपूर्वी येथे आलेल्या महापुरात बाजारपेठ पाण्याखाली गेली होती. झालेल्या नुकसानामुळे व्यापारी हतबल झाले असून आजही दुकानांमधील चिखल उपसत आहेत. या महापुरानंतर खुद्द राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह डझनभर इतर मंत्री, विविध पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधींनी येथील दौरा केला. अनेकांनी राज्यासह केंद्र सरकारकडून भरीव पॅकेज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. नुकतीच राज्य शासनाने दुकानदारांना 50 हजार, टपरीधारक, प्रत्येक पूरग्रस्ताला 10 हजार, पूर्ण घर पडलेल्या कुटुंबाला दीड लाख, अर्धे घर पडलेल्या कुटुंबाला 50 हजार रूपये अशी मदत जाहीर केली आहे. या मदतीवर सर्वच आपद्ग्रस्त नाराज आहेत. मात्र व्यापाऱयांची नाराजी मोठी आहे.
नुकसान लाखात असताना हजारात मदत घेऊन करायचे काय, असा प्रश्न व्यापारी विचारत आहेत. त्यामुळे जाहीर केलेल्या मदतीचा फेरविचार करून टपरीधाराकांना 1 लाख रूपये, लहान व्यापाऱयांना 3 लाख रूपये, मध्यम व्यापाऱयांना 5 लाख तर मोठय़ा व्यापाऱयांना 8 ते 10 लाख रूपये मदत देण्याची मागणी होत आहे. हे शक्य नसेल तर ज्यांची व्यापारी कर्जे नाहीत, अशा व्यापाऱयांना मोठी मदत तर व्यापारी कर्ज असणाऱयांना शेतकऱयांप्रमाणे कर्जमाफी व कमी व्याजाने पुन्हा कर्ज देण्याची तरतूद करण्याची मागणी व्यापाऱयांमधून होत आहे.