प्रतिनिधी / महाबळेश्वर
महाराष्ट्राचे नंदनवन म्हणुन प्रसिध्द असलेले महाबळेश्वर पर्यटकांसाठी खुले झाले असुन कोणत्याही क्षणी महाबळेश्वरचे पॉईंट देखिल पर्यटकांसाठी खुले करण्याचे आदेश येण्याची शक्यता गृहीत धरून पुढील दोन दिवसात सर्व पॉईंटची स्वच्छता करून सुरक्षेचा आढावा घेण्याचा निर्णय वनक्षेत्रपाल दिलीप झगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समितिच्या बैठकीत घेण्यात आला.
सातारा जिल्ह्यातील कोरोना रूग्ण वाढीचा दर खाली आल्याने जिल्ह्यात लागु करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम शिथील करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी जाहीर केला. त्यामुळे तब्बल साडे तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर महाबळेश्वर पर्यटकांसाठी खुले झाले.
पहिल्याच दिवशी येथे एक हजार ५४ पर्यटकांनी येवुन पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटला. पावसाळ्यात येणारे पर्यटक हे पॉईंट पाहण्यासाठी नव्हे तर पावसात मनसोक्त भिजण्यासाठी तसेच डोंगरावरून वाहणारे जपप्रपात धबधबे पाहण्यासाठी येतात अशा हौशी पर्यकांची येथे आता काही दिवसातच गर्दी होण्यास सुरूवात होईल हे आज आलेल्या पर्यटकांच्या गर्दीवरून स्पष्ट होत आहे दरम्यान महाबळेश्वरची बाजारपेठही उद्या सोमवारपासुन सुरू होणार असल्याने पावसाळी पर्यटनांसोबत महाबळेश्वरच्या खास बाजारपेठेत पर्यटकांना खेरेदीचा आनंद लुटता येणार आहे.
पावसाळयात सुरक्षेच्या दृष्टीने महाबळेश्वरचे अनेक पॉईंट हे बंदच असतात परंतु शहराजवळ आणि पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित असलेले काही पॉईंट हे वन विभागाच्या ताब्यात आहेत. त्याचप्रमाणे येथील प्रसिध्द वेण्णालेक हा पालिकेच्या ताब्यात आहे. वन विभागाच्या ताब्यात असलेल्या पॉईंटपैकी केटस् पॉईंट, विल्सन पॉईंट, लॉडविक पॉईंट, मुंबई पॉईंटआणि प्रसिध्द लिंगमळा धबधबा हे पॉईंट पर्यटकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शेखरसिंह लवकरच प्राप्त होणार आहेत. परंतु तत्पुर्वी सर्व पावसाळी पॉईंटच्या स्वच्छतेचे काम हाती घेणे आवश्यक आहे यासाठी आज वनक्षेत्रपाल दिलीप झगडे यांच्या अध्यक्षतेखाली येथील हिरडा विश्राम गृहावर संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांच्या अध्यक्ष व सचिवांची त्याचप्रमाणे महासमितीचे पदाधिकारी यांची महत्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येण्यापुर्वीच सर्व पॉईंटची स्वच्छता करून पॉईंट हे पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित असल्याचा आढावा समितीने पुढील दोन दिवसात घ्यावा असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
महाबळेश्वर शहरात येणारे पर्यटकांची पाचगणी येथील दांडेघर नाक्यावर रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट घेण्यात येणार असली तरी नाक्यावर आलेल्या पर्यटकांची ऑक्सीजन लेवल व टेंम्परेचर तपासण्यात येणार आहे त्याचप्रमाणे पावसाळ्यात हुल्लडबाज पर्यटकही येतात अशा पर्यटकांचा इतर पर्यटकांना त्रास होवु नये यासाठी वन व्यवस्थापन समितीच्या वतीने सुरक्षा गार्ड नेमण्यात येणार आहे सर्व पाँईट हे वेळेवर बंद होणार आहेत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशापुर्वी एक तास आधीच पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
या बैठकीला संयुक्त वन व्यवस्थापन महासमितीचे अध्यक्ष विजय भिलारे सचिव एल डी राउत, तानाजी केळगणे, संजय कमलेकर, अनिल केळगणे, रमेश चोरमले, पंढरानाथ लांगी, विलास मोरे, नाना वाडेकर, संजय केळगणे, धनंजय केळगणे, संदिप भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते