सांगली/प्रतिनिधी
सिंचनाच्या कामामुळे सांगली जिल्हा लवकरच 100 टक्के सिंचनाखाली येईल. पाणी योजनेबरोबरच राष्ट्रीय महामार्ग यामुळे जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी केले. तरुण भारत सांगली आवृत्तीच्या 29 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नेमिनाथ नगर येथील वाडीकर मंगल कार्यालय मध्ये शनिवारी तरुण भारत सोशल मीडिया च्या वतीने तरुण भारत संवाद या उपक्रमांतर्गत फेसबुक लाईव्ह मध्ये त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. तरुण भारतचे संपादक मंगेश मंत्री यांच्यासह टीम तरुण भारत च्या वतीने त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. तरुण भारत बेळगावचे संपादक जयवंत मंत्री यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनानंतरचे जग, नागरिकांनी घ्यावयाची काळजी, महापुराबाबतच्या उपायोजना, जिल्ह्यात होऊ घातलेले नवे महामार्ग, पर्यटनाचा विकास, सिंचन व कृषी योजना, जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना, जिल्ह्यात नवीन हेलिपॅडची निर्मिती अशा विविध विषयांवर मते व्यक्त केली. कोरोना तसेच महापूर अशा संकटामध्ये सांगली जिल्हा लोकांच्या मदतीसाठी एकसंघ पणे धावून आला. असे आवर्जून नमूद करत जिल्हाधिकारी यांनी पर्यटनामध्ये जिल्ह्याला मोठा वाव असल्याचे स्पष्ट केले. शहरात सुसज्ज नाट्यगृहाची उभारणी आणि आरोग्य सेवांचे अत्याधुनिकीकरण करण्याबरोबरच हळद, बेदाणा, गुळ, द्राक्षे, भडंग आदी उत्पादनांचे चांगले ब्रँडिंग तसेच औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.