तालुका म. ए. समितीचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
अन्यायाने कर्नाटकात डांबल्या गेलेल्या मराठी भाषिकांना या ना त्या कारणाने डिवचण्याचा प्रकार नेहमीच होत असतो. या अन्यायाविरोधात आवाज उठवून मराठी भाषिकांची ताकद पुन्हा एकदा दाखवून देण्यासाठी दि. 25 रोजी होणारा महामोर्चा व दि. 1 नोव्हेंबर रोजी होणारी सायकलफेरी यामध्ये मोठय़ा संख्येने मराठी भाषिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले.
तालुका म. ए. समितीची महत्त्वाची बैठक शनिवारी जत्तीमठ येथे पार पडली. प्रास्ताविक करताना सरचिटणीस मनोज पावशे म्हणाले, मागील 65 वर्षांपासून आपल्या न्याय्य हक्कासाठी मराठी भाषिक न्यायालयीन लढा देत आहेत. या लढय़ाचा एक भाग म्हणून समितीच्यावतीने आंदोलने छेडली जातात. मराठी भाषिक मराठी भाषा व संस्कृतीच्या जतनासाठी या आंदोलनांमध्ये मोठय़ा संख्येने सहभागी झाले आहेत. भाषावार प्रांतरचना झाल्यावर अन्यायाने सीमाभाग कर्नाटकात डांबला गेला या निषेधार्थ 1 नोव्हेंबर रोजी हरताळ पाळून निषेध व्यक्त केला जातो. यादिवशीच्या सायकल फेरीमध्ये मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात म्हात्रू झंगरूचे म्हणाले, भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार देण्यात आलेले अधिकार मराठी भाषिकांना मिळत नाहीत. त्यामुळे मराठीतून फलक, मराठीतून परिपत्रके देण्यासोबतच महानगरपालिकेसमोरील अनधिकृत ध्वज काढण्यासाठी दि. 25 रोजी महामोर्चा काढला जाणार आहे. यामध्ये मोठय़ा संख्येने मराठी भाषिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. यानंतर अशोक पाटील, यशवंत मोरे, सुरेश डुकरे, प्रशांत पाटील यांनी आपले विचार मांडले.
यावेळी नामदेव सांबरेकर, कृष्णा पाटील, निंगाप्पा देसूरकर, लक्ष्मण खांडेकर, मारुती पाटील, बाळू इंगळे, पुंडलिक मोरे, नागेंद्र शहापूरकर, विशाल चौगुले, धाकलू कडोलकर, एन. वाय. चौगुले, रोहित पाटील, उत्तम अष्टेकर, सी. एच. हुद्दार, कुशापा होळी आदी उपस्थित होते.