ऑनलाईन टीम / मुंबई :
मजेदार आणि दर्जेदार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. आणि अशा या सगळ्यांच्या लाडक्या हास्यकत्रेचे 300 भाग पूर्ण होत आहेत. ही अतिशय आनंद आणि समाधानाची बाब आहे की गेली 2.5 वर्ष संपूर्ण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम सगळ्यांना खळखळून हसवते आहे.
हसणं हा सगळ्यावरचा रामबाण उपाय आहे असं म्हटलं जात आणि हे हसवणं गेले चार सीजन सातत्याने महाराष्ट्राची हास्यजत्रा आपल्या प्रेक्षकांना देत आहे. नवनवीन संकल्पना, आपलेसे वाटणारे विषय, भन्नाट टाईमिंग, हवीहवीशी वाटणारी पात्र आणि कमाल विनोद या सगळ्यांचा मिलाफ म्हणेज महाराष्ट्राची हास्यजत्रा.
कधी विनोदी तर कधी मार्मिक पद्धतीने प्रेक्षकांना आपले वाटणारे विषय हास्याचे महारथी सादर करतात. विनोदाची पातळी राखून, चिकाटीने इतर कोणावरही व्यंग न करता विनोद करणं आणि प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्याचं शिवधनुष्य हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमने लीलया पेललं आहे.
या कार्यक्रमातील काही गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आणि प्रसिद्धही झाल्या. प्राजक्ता माळीच्या खुसखुशीत आणि प्रसन्न निवेदनासोबतच तिची वा दादा वा ही दिलखुलास दादही लोकप्रिय झाली. सईताम्हणकरनं कलाकारांच्या केलेल्या निखळ कौतूकासोबत तिची जुजबी दाद पण चर्चेत आली. आणि अत्यंत सुंदर शब्दांचा फुलोरा रचत प्रसाद ओकने केलेल्या मार्मिक टिपणीसोबत त्याने न दिलेली पार्टीही लोकप्रिय झाली.
300 नाबाद भागांचा एक सुंदर सोहळा प्रेक्षकांना 17-18 फेब्रुवारीला पाहायला मिळणार आहे आणि या सोहळ्याला उपस्थिती लावली आहे सुप्रसिद्ध तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या टीमनी.
मालिकेतील जेठालाल, भिडे, पोपटलाल, माधवी भाभी, कोमल भाभी आणि मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी हे 300 नाबादच्या या सोहळ्याला हजर होते. अनेक वर्षांनी एवढं हसलो अशी प्रतिक्रिया या वेळी मालिकेत आत्माराम भिडेंची भूमिका साकारणाऱ्या मंदार चांदवडेकर यांनी दिली. तर इथली सर्व ऊर्जा घेऊन आम्ही आमच्या मालिकेतही ती आणण्याचा प्रयत्न करू असं मालिकेचे निर्माते असित कुमार म्हणाले.