ऑनलाईन टीम / मुंबई :
रेमडेसिवीर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्र शासनाने सांगूनही औषधांचा पुरवठा करण्यात आलेला नाही. केंद्राने यासंबंधीचे निर्देश दिले असून, महाराष्ट्राला औषधांचा पुरवठा केल्यास तात्काळ कारवाई करु असा इशाराही दिला आहे, असा खळबळजनक आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिक यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर अशा शब्दात ताशेरे ओढले आहेत.
केंद्राने ही काय परिस्थिती निर्माण करुन ठेवली आहे हा थेट सवाल उपस्थित करत, या औषधांच्या विक्रिला परवानगी द्या नाहीतर महाराष्ट्राच्या भूमीवर असणाऱ्या या औषधांच्याबाबत अत्यंत कठोर भूमिका घेत एफडीएच्या मंत्र्यांच्या मदतीने पावले उचलत कारवाई करत कंपन्या सील करु आणि औषधांचा जनतेला पुरवठा करु असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.
महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबतही केंद्राचा अडथळा असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. देशातील परिस्थितीचा आढावा घेत ही युद्धजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी लष्कराला कामाला लावणं अपेक्षित होते, पण देशाचे पंतप्रधान मात्र निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र होते.
आता फतवा काढा, ज्यांचा मृत्यू कोरोनामुळे होतोय त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो छापण्यास उद्यापासून सुरुवात करा, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवाब मलिक यांनी जोरदार टोला लगावला. देशातील आरोग्यमंत्री बेजबाबदारपणे काम करत असून, मोदींचे याकडे लक्ष नाही. पण, वेळ अजूनही गेलेली नाही, पंतप्रधानांनी यात लक्ष द्यावे. सध्याच्या घडीला होणाऱ्या रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावर लक्ष द्या, ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरही लक्ष द्या म्हणत त्यांनी केंद्र शासनाला सतर्कही केले आहे.
- …अन्यथा माफी मागा : केशव उपाध्याय
नवाब मलिक यांनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी असे खुले चॅलेंज भाजपने दिले आहे.
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी ट्विट करत सांगितले की, नवाब मलिक यांनी केलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत. जर मलिक यांच्याकडे पुरावे असतील तर आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागा, असे म्हटले आहे.