परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांची ग्वाही, -महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स काँग्रेसचा मेळावा
प्रतिनिधी/कोल्हापूर
सद्यस्थितीत एस.टी महामंडळ तोट्यात असले तरी महाविकास आघाडी सरकार एस.टी.कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. कर्मचाऱयांचा प्रलंबित महागाई भत्ता देण्यासाठी 15 कोटींची तरतूद करण्याबरोबरच अन्य मागण्यांबाबत येत्या बुधवारी बैठक घेऊन सकारात्मक मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स कॉंग्रेसच्या कोल्हापूर विभागाच्यावतीने जिल्हा काँग्रेस कमिटी सभागृहात एस.टी. कर्मचाऱयांच्या राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिवहन राज्यमंत्री पाटील यांनी कर्मचाऱयांच्या मागण्या वेळोवेळी सरकारकडे पोहोचवण्यासाठी एक वकील म्हणून काम करण्याची ग्वाही दिली. खासगीकरणाच्या युगात, एस.टी.ने यापूर्वी दिलेली सेवा विसरू शकत नाही. एस टी कर्मचाऱयांनी विश्वासाहर्ता जोपासल्यामुळेच एस. टी. वरचा विश्वास आजही कायम आहे. एस.टी.चे नाते सामान्य माणसाबरोबर जोडले गेले आहे. स्पर्धेच्या युगात एस.टी.ची हीच विश्वासहर्ता टिकविण्याचे आव्हान कर्मचाऱ्यांनी पेलावे. असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.
संप काळात एस.टी. कर्मचाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले खटले कायदेशीर अभ्यास करून मागे घेण्यासाठी प्रयत्न करू. ग्रामीण दळणवळणाचा कणा असणारी एस टी चांगल्या प्रकारे चालली पाहिजे. यासाठी सरकार कर्मचाऱयांच्या पाठीशी असून त्यांच्या मागण्यांबाबत येत्या बुधवारी बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढू, अशी ग्वाही परिवहनमंत्री पाटील यांनी दिली. तसेच कर्मचाऱयांच्या अनेक मागण्या असल्या तरी त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे अभिवचन त्यांनी दिले.
इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड म्हणाले, कोरोना काळात एस.टी.महामंडळ पूर्णपणे तोट्यात गेले होते. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचा पगार थकीत राहिला होता. त्याबाबत परिवहनमंत्री सतेज पाटील यांनी शासनाकडून निधीची तरतूद करून कर्मचाऱ्यांना पगार देण्याचे मोठे काम केले. पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना, एस.टी. महामंडळाचा केवळ साडेचारशे कोटीचा तोटा झाला होता. मात्र फडणवीस सरकारमध्ये दिवाकर रावते यांच्याकडे परिवहन खाते आल्यानंतर सहा हजार कोटींनी एसटी महामंडळ तोट्यात गेले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी परिवहन मंत्री दिवाकर रावतेच्या काळात एस. टी. चे खाजगीकरण करून भष्ट्राचाराचा कळस गाठला गेला. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न परिवहन राज्यमंत्री पाटील यांनी मार्गी लावून एसटीला आर्थिक मदत केल्याबद्दल कर्मचाऱ्यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार पी एन पाटील, इंटकचे सचिव मुकेश तिकोटे, इंटकचे राज्य उपाध्यक्ष बंडोपंत वाडकर, विभागीय सचिव आप्पासाहेब साळोखे आदींनी मनोगत व्यक्त केल. मेळाव्यास महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस गुलाबराव घोरपडे, इंटकचे माजी जिल्हाध्यक्ष ए.डी.पाटील, दत्तात्रय गूठे, आनंदराव दोपारे, एम के भोसले, अण्णा बनसोडे, काँग्रेसचे जिल्हा सचिव संजय पोवार-वाईकर, यांच्यासह महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स कॉंग्रेसचे राज्यातील पदाधिकारी, सदस्य एस.टी. कर्मचारी उपस्थित होते.
मेळाव्यातील मागण्या
भाजप सरकारच्या काळात परिवहन खात्यात झालेल्या कारभाराची श्वेत पत्रिका काढावी, आत्महत्या केलेल्या कर्मचाऱयांच्या कुटूंबियांना शेतकऱ्यांप्रमाणे पाच लाखांची मदत करावी, कोरोना काळात कर्मचाऱयांना रेशनवर मोफत धान्य द्यावे, महागाई भत्यासाठी दिवाळीपूर्वी 15 कोटींची तरतूद करावी.
इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांचे आरोप
– एस.टी. कर्मचारी व अधिकाऱयांच्या बदल्यांसाठी पैशाची मागणी
– एस.टी. महामंडळाचा नैसर्गिक तोटा नसून मानवी तोटा
– महामंडळामध्ये अनावश्यक खर्च