ऑनलाईन टीम / नगर :
भाजपशी शिवसेनेचा काडीमोड झाल्याने महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. पण महाविकास आघाडीचा संसार असा आहे की, राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको अन् काँग्रेस बिनबुलाये वऱ्हाडी आहे. कितीही तिरस्कार केला तरी जेवणासाठी आलेली ही वऱ्हाडी ताट सोडायला तयार नाही, असा घाणाघात भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला.
विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडीतील अनेक नेते भ्रष्टाचारी आहेत. ज्यांनी भ्रष्टाचार केला. त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. देशाचे पंतप्रधान म्हणतात की, मी चौकीदार आहे, त्यामुळे देशाचं संरक्षण करणं त्यांचं कर्तव्य आहे. जर तुम्ही भ्रष्टाचार केला नसेल तर पुरावे द्यावे, टीव्हीवर येऊन बोलण्याची काय गरज आहे आम्ही केवळ दोन मंत्री उचलले तर तुमची एवढी तळतळ होते, अजून तर खूप मोठी लिस्ट आहे.
एक सक्षम आणि अभ्यासू विरोधीपक्ष म्हणून फडणवीस यांनी उत्तम कामगिरी केली. त्यांच्या मागे पक्ष ठामपणे उभा राहिला. मागील सरकारच्या काळात राधाकृष्ण विखे पाटील विरोधीपक्ष नेते होते. त्यावेळी त्यांनी अशीच कामगिरी केली होती. दुर्दैवाने त्यावेळी काँग्रेस पक्षानं त्यांना अपेक्षित साथ दिली नाही. उलट जिह्यातील काही नेत्यांनी विरोधच जास्त केला. त्यामुळंच तर काँग्रेस सोडण्याची वेळ आमच्यावर आली, असेही विखे म्हणाले.