गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा घेऊन सखोल चौकशीची मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांवर धक्कादायक आरोप केले. या धक्कादायक घडामोडीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात या सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून भारतीय जनता पार्टीच्यावतीने महाराष्ट्र भर गृहमंत्री आणि या सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी होत आहे. कोल्हापूरातही भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
रविवारी भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने बिंदू चौकात सकाळी 11 वाजता भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. 100 कोटी माझे.....आता नाहीत वाझे माझे',
महा वसुली सरकारचा धिक्कार असो’, गृहमंत्री राजीनामा द्या'
अनिल देशमुख हे गृहमंत्री की….वसुली मंत्री’, अनिल देशमुख यांचा धिक्कार असो’, ठाकरे सरकार चले जाओ',
आता तर हे स्पष्ट आहे……ठाकरे सरकार भ्रष्ट आहे’ असे फलक घेऊन घोषणांनी बिंदू चौक परिसर दणाणून सोडला. भाजपा सरचिटणीस हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर,सरचिटणीस विजय जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांनी सरकारचा तीव्र निषेध केला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, पोलीस अधिकारी परमवीर सिंह यांनी थेट गृहमंत्र्यांवर जे आरोप केले आहेत यामुळे या सरकार मधील वसुली एक प्रकारे चव्हाटÎावर येऊन महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे काम या प्रकरणामुळे उजेडात आले आहे. या सर्व प्रकरणावर जाणते राजे म्हणवून घेणारे नेते सध्या अबोल आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी करत असल्याचे सांगितले. या प्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.