सर्व विद्यार्थी, प्राध्यापकांच्या कोविड चाचण्या करण्याचे आदेश
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता तब्बल वर्षभरानंतर महाविद्यालयेत सुरू होणार आहेत. मात्र, सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकांची कोरोना चाचणी करुनच महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सर्व महाविद्यालयांना दिले आहेत.
गतवर्षी मार्च 2020 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आणि शाळाही बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनाचा जसा प्रभाव कमी होऊ लागला, तसे सर्वप्रथम 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. कोविडच्या नियमांचे पालन करून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू होत आहेत. त्यानंतर आता महाविद्यालये सरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.
राज्यातील काही जिल्हय़ांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सिंधुदुर्गात खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध आणले आहेत. त्यानंतर आता महाविद्यालये सुरू करताना विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. नियम काटेकोरपणे पाळावेत, अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हय़ात आता प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरापासून कोरोना तपासणीचे स्वॅब कलेक्शन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापकांनी कोविड चाचणी केल्याशिवाय महाविद्यालयात प्रवेश करू नये, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हय़ातील अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयातील वर्ग, उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 3 फेब्रुवारी 2021 रोजी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाविद्यालयात वर्ग सुरू करण्यापूर्वी सर्व संबंधित अध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱयांची कोविड-19 चाचणी करणे आवश्यक आहे. कोविडची चाचणी न केल्यास व आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता विधान संहिता कलम 188, 269, 270, 271 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 सह अन्य तरतुदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिले आहेत.