रोहयोच्या महिलांचा उचगाव येथे सत्कार : सर्वच क्षेत्रामध्ये स्त्रिया पुढे जाताना दिसतात ही अभिमानाची गोष्ट
वार्ताहर / उचगाव
स्त्रियांनी चूल, मूल, घरदार एवढेच न बघता घराच्याबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. स्त्री शिकली तर घर शिकेल व सर्व जनता सुशिक्षित होईल, त्याचप्रमाणे आजच्या काळामध्ये स्त्रियांनी घराबाहेर पडून सर्व क्षेत्रांमध्ये मोठय़ाप्रमाणात प्रगती केलेली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया आज सर्वच क्षेत्रामध्ये पुढे आल्या आहेत. पूर्वीच्या काळी स्त्रियांसाठी घरातील काम करणे व घरांमध्ये राहणे असे होते. परंतु क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घालून घराघरांमध्ये स्त्री शिक्षण पोहोचवले. त्यामुळे आज सर्वच क्षेत्रामध्ये स्त्रिया पुढे जाताना दिसत आहेत. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. असे उद्गार ऍड. अनिल पावशे यांनी उचगाव येथील ग्रामपंचायतीतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रोहयोच्या महिलांचा सत्कार समारंभ मळेकरणी आमराईमध्ये आयोजित केला होता. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष जावेद जमादार होते. यावेळी मळेकरणी देवीची विधीपूर्वक पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात केली. उचगाव आरोग्य केंद्राच्या वैद्याधिकारी स्मिता गोडसे यांनीही महिलांच्या अडचणी आणि कोरोनावर अनेक उदाहरणे देऊन आपले विचार मांडले.
सुविधांचा योग्य वापर करावा
यावेळी पुढे बोलताना अनिल पावशे म्हणाले, सरकारने महिलांसाठी अनेक योजना व अनेक सुविधा दिल्या आहेत. त्यांचा योग्यवापर करून महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे. सध्या सर्वत्र उद्योग खात्री योजना ही मोठय़ाप्रमाणात सुरू आहे. या योजनेचाही महिलांनी चांगल्याप्रकारे लाभ घ्यावा, जे आपण काम करतो ते प्रामाणिकपणे करून सरकारच्या योजना लोकांमार्फत येत आहेत. त्या सार्थकी लावाव्यात. रोजगारतर्फे केलेली कामेसुद्धा निकृष्ट दर्जाची न करता चांगल्या प्रकारे करून प्रत्येक नाला, तलावामध्ये ते काम करण्यात यावे. त्यामुळे पाणी आडवा पाणी जिरवा हा प्रश्न मार्गी लागणार आहे. तरी सर्वांनी आज एकच दिवस महिला दिन न करता वर्षातील 365 दिवस महिलांचा मानसन्मान करावा. महिलांचा आदर करावा, असे सांगितले.
‘फर्स्ट एड बॉक्स’ सुपूर्द
तालुका पंचायतीचे एक्झिक्मयुटिव्ह ऑफिसर मल्लिकार्जुन कलादगी यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी रोजगार महिलांना काम करताना काही जखम झाल्यास त्यांना औषधोपचाराचे ‘फर्स्ट एड बॉक्स’ उपस्थित अधिकाऱयांच्या हस्ते देण्यात आले. पाणी पिण्यासाठी कलशा वितरण करण्यात आल्या. ग्रामविकास अधिकारी प्रकाश कुडची, ग्रा. पं. च्या उपाध्यक्षा मथुरा तेरसे, ग्रा. पं. सदस्य यादो कांबळे, मोनाप्पा पाटील, बंटी पावशे, गजानन नाईक, उमेश बुवा, दत्ता बेनके, लक्ष्मी कुराडे, बाळकृष्ण तेरसे, सुरज सुतार, स्मिता खंडेकर, योगिता देसाई, रुपाली गिरी, रुपा गोंधळी, माधुरी पाटील, नागरत्न कोरडे, अनुसया कोलकार, अमरीन बंकापूर, अंजना जाधव, आशा कार्यकर्त्या, उचगाव भागातील कोनेवाडी, बसुर्ते, उचगाव येथील पाचशे रोजगार महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन एल. डी. चौगुले यांनी केले. योगिता देसाई यांनी आभार मानले. यावेळी ग्रा. पं. चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.