वृत्तसंस्था / दुबई
आयसीसीच्या ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मेलबोर्नच्या क्रिकेट मैदानावर यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात झालेल्या अंतिम सामन्याला संपूर्ण जगातून शौकिनांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. भारतातून सुमारे 9.02 दशलक्ष शौकिनांनी या सामन्याचा आनंद घेतला. या अंतिम सामन्याला 86,174 शौकिनांनी आपली विक्रमी हजेरी दर्शविली, असे आयसीसीच्या प्रवक्त्याने सांगितले.
21 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान सदर स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये खेळविली गेली. टीव्ही आणि इतर डिजिटल माध्यमातून या स्पर्धेला विक्रमी प्रतिसाद मिळाल्याचे आयसीसीतर्फे सांगण्यात आले. भारतामध्ये सुमारे 5.4 कोटी एकूण मिनिटांच्या कालावधीची नोंद झाली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सुमारे 1.1 कोटी शौकिनांनी व्हिडिओ माध्यमातून या स्पर्धेचा आनंद उपभोगला. महिला क्रिकेटच्या इतिहासामध्ये ऑस्ट्रेलियातील या स्पर्धेने सर्व विक्रम मागे टाकले आहेत. 2019 साली झालेल्या आयसीसीच्या पुरूषांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवेळी टीव्ही माध्यमातून पाहणाऱया शौकिनांनी विश्वविक्रम केला होता. महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. 2018 साली या स्पर्धेतील झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्याच्या तुलनेत भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याला 59 पटीने शौकिनांची संख्या अधिक नेंदविली गेली आहे.