2021-22 मध्ये सरकारकडे 27.07 लाख कोटी रुपये जमा
मुंबई / वृत्तसंस्था
31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात भारताच्या कर संकलनात 27.07 लाख कोटी रुपयांपर्यंत विक्रमी वाढ झाली आहे. उत्पन्न आणि इतर प्रत्यक्ष कर तसेच अप्रत्यक्ष करांमध्ये वाढ झाल्यामुळे 2021-22 या आर्थिक वर्षात करसंकलनाने विक्रमी पातळी गाठल्याचे महसूल सचिव तरुण बजाज यांनी शुक्रवारी सांगितले.
1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत 27.07 लाख कोटी रुपयांचे एकूण करसंकलन झाले आहे. करसंकलनाचा हा आकडा अर्थसंकल्पाच्या 22.17 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत अधिक असल्याचे महसूल सचिवांनी सांगितले. प्रत्यक्ष करांमध्ये प्राप्तिकर आणि कॉर्पोरेट करांचा समावेश होत असून तो 14.10 लाख कोटी रुपये इतका जमा झाला आहे. बजेट अंदाजापेक्षा हे करसंकलन 3.02 लाख कोटी रुपयांनी जास्त आहे. तर, उत्पादन शुल्कासारखे अप्रत्यक्ष कर बजेट अंदाजापेक्षा 1.88 लाख कोटींनी अधिक झाले आहे. अप्रत्यक्ष कर संकलन 12.90 लाख कोटी रुपये झाले आहे. अर्थसंकल्पामध्ये हा आकडा केवळ 11.02 लाख कोटी इतका होता.