वृत्तसंस्था/ मुंबई
भारताच्या माजी नेमबाज व प्रशिक्षिका पूर्णिमा जनाने यांचे वयाच्या 42 व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. गेल्या दोन वर्षापासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनाबद्दल माजी ऑलिम्पिक सुवर्णविजेत्या अभिनव बिंद्रासह अनेकांनी दुःख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
दोन वर्षापूर्वी केरळमध्ये राष्ट्रीय स्पर्धा सुरू असताना त्यांना कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावर त्यांनी उपचारही करून घेतले होते. या उपचारानंतर त्या जवळपास पूर्ण बऱया झाल्या होत्या, असे माजी नेमबाज जॉयदीप कर्माकर यांनी सांगितले. त्यांनी आयएसएसएफच्या अनेक विश्वचषक स्पर्धा, आशियाई चॅम्पियनशिप्स, राष्ट्रकुल अशा अनेक स्पर्धांत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 2012 मध्ये त्यांनी नेमबाजीतून निवृत्ती घेतली आणि 2014 मध्ये त्यांनी प्रशिक्षिका म्हणून कारकीर्द सुरू केली. पण दुर्दैवाने त्यांना कर्करोगाची बाधा झाली आणि सोमवारी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. मुंबईतून कारकीर्द सुरू केल्यानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या होत्या. महाराष्ट्र सरकारने त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानेही सन्मानित केले होते.