वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे माजी राष्ट्रपती, ‘भारतरत्न’ प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीतील लोधी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि पुत्र अभिजित मुखर्जी यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला.
त्यापूर्वी मुखर्जी यांचे पार्थिव सकाळी लष्करी इस्पितळातून दिल्लीतील राजाजी मार्गावरील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी आणण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिलेल्या मान्यवरांमध्ये समावेश राहिला.
त्याशिवाय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे, हवाई दलाचे प्रमुख पी. के. एस. भदुरिया, नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंग, भाजप नेते ज्योतिरादित्य सिंदिया, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही यावेळी मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली.
अंत्यसंस्कारांवेळी काही निवडक काँग्रेस कार्यकर्ते व काही हितचिंतकही हजर होते. मुखर्जी यांच्या परिवारातील काही सदस्यांनी आणि काही नातलगांनी ‘पीपीई कीट’ परिधान करून त्यांना अखेरचा निरोप दिला. कोरोना विषाणूची चाचणी सकारात्मक आलेल्या मुखर्जी यांच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेनंतर ते कोमामध्ये गेले होते. त्यानंतर काही आठवडय़ांनी सोमवारी त्यांचे निधन झाले. केंद्र सरकारने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत दुखवटा जाहीर केलेला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाला दुःख
केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी माजी राष्ट्रपती मुखर्जी यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना देशातील एक वैशिष्टय़पूर्ण नेता आणि उत्कृष्ट संसदपटू गमावला असल्याचे म्हटले.
पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मुखर्जी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ याप्रसंगी दोन मिनिटे मौन पाळले.
सात वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आणि केंद्र सरकारात वित्त, परराष्ट्र व्यवहार अशी अत्यंत महत्त्वपूर्ण खाती हाताळलेल्या मुखर्जी यांनी 2012 ते 2017 दरम्यान भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला होता. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झालेले मुखर्जी एक अत्यंत प्रशंसनीय आणि आदरणीय राजकीय नेते होते.
दरम्यान, कोविडच्या महामारीमुळे मुखर्जी यांच्या अंत्यसंस्कारास बरेच लोक येऊ शकले नाहीत. निर्बंध लागू नसते, तर कुटुंबाने पश्चिम बंगालमध्ये अंत्यसंस्कार करण्याचा विचार केला असता, असे त्यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांनी स्पष्ट केले.