प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील विविध रस्त्याचे काँक्रिटीकरण स्मार्ट सिटी योजनेमधून करण्यात येत आहे. अलिकडेच संपर्क रस्त्यावर रॅम्प बनविण्याचे काम करण्यात येत असून, फिशमार्केट समोरील रस्त्यावर रॅम्प बनविण्यात आले आहे. मात्र येथील मातीचे ढिगारे अद्यापही हटविण्यात आले नाहीत. त्यामुळे अडथळय़ांच्या शर्यतीमध्ये वाहनधारकांना ये-जा करावी लागत आहे.
या अंतर्गत खानापूर रोडचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र या रस्त्याला जोडणाऱया रस्त्यांवर रॅम्प करण्यात आले नव्हते. त्यामुळे वाहनधारकांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागतो. ठिकठिकाणी रॅम्प नसल्याने काही ठराविक मार्गानेच वाहनधारकांना मुख्य रस्त्याकडे जावे लागत होते. काही ठिकाणी खडी व माती टाकून तात्पुरता रस्ता बनविण्यात आला होता. पण दुचाकी वाहनधारकांना याचा फटका बसत होता. काही दिवसानंतर माती आणि खडी बाजुला सरकून चरी निर्माण होत आहेत. त्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. विविध संपर्क रस्त्यावर रॅम्प बनविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 15 दिवसांपासून रॅम्प बनविण्यात येत असून, कॅन्टोन्मेंट व्यापारी संकुलाशेजारील रस्त्यावर रॅम्प घालण्यात आले आहे. पण येथील मातीचा ढिगारा अद्यापही हटविण्यात आला नाही. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे सदर मातीचा ढिगारा हटविण्यात यावा, अशी मागणी होत आहे.