नवी मुंबई : कोणताही कायदा करताना संबंधित घटकाला विचारात घेण्याची व समन्वयाची गरज असते, असा विचार न केल्यामुळे आज माथाडी कामगार उपासमारीच्या जवळपास टेकला आहे. माथाडी कामगार क्षेत्रात मोठ्या कार्पोरेट कंपन्यांनी प्रवेश केल्यामुळे शेतकरी, कामगार, व्यापारी असे सगळेच अडचणीत सापडले असून, यासाठी व्यापारी, कामगार, शेतकरी वर्ग यांच्याशी सल्लामसलत करुन ही समस्या सोडविली पाहिजे, पण ही समस्या सोडविताना सरकारी यंत्रणाही राहिली पाहिजे हा अत्यंत महत्वाचा भाग आहे, असे वत्कव्य महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केले.
नवीमुंबईतील माथाडी भवन येथे आज पार पडलेल्या माथाडी कामगार, व्यापारी, वाहतुकदार कृती समितीशी संवाद साधताना दरेकर म्हणाले, माथाडी कामगारांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करुन त्यांना रेल्वेने व सरकारी परिवहन वाहनांमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी, तसेच या घटकाला ५० लाखाचे विमा संरक्षण कवच द्यावे. व्यापा-यांना सकाळी १०-०० ते ३-०० किंवा ६-०० या वेळेत व्यापार करण्याची परवानगी द्यावी, वाहतुकदारांना रस्त्यावर उभे रहाण्यास येणारी अडचण दूर करावी या मागण्यांसाठी मी आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मागे खंबीरपणे उभे आहोत. यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री, मुख्य सचिव यांचेशी चर्चा करुन आंम्ही या समस्या नक्कीच दूर करु, असे ठोस आश्वासनही प्रविण दरेकर यांनी दिले.