शारदोत्सव सोसायटीतर्फे ऑनलाईन कार्यक्रम : वसंत कानेटकर खऱया अर्थाने देशी नाटककार
प्रतिनिधी /बेळगाव
नाटककार वसंत कानेटकर यांच्या नाटकांमधून मानवी आणि शाश्वत मूल्यांचा आविष्कार व्यक्त होतो. त्यांची नाटके मानवी भावभावनांचा ठाव घेतात. सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, राजकीय अशा अनेक विषयांवर वसंत कानेटकर यांनी नाटके लिहिली. त्यामुळे खऱया अर्थाने ते देशी नाटककार होते, असे विचार लेखिका मेधा मराठे यांनी व्यक्त केले.
शारदोत्सव सोसायटीतर्फे कै. वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ऑनलाईन वसंत रंगोत्सव कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, लेखकाला कल्पना कशी सुचते, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र ती कल्पना अंतरमनातून येते, असे कानेटकर म्हणत. लेखक अनेक भावभावनांचे चिंतन करतो आणि लेखन करतो. त्यांनी सुखांतिका आणि शोकांतिका असणारी नाटके लिहिली. कारण मानवी मन हे या दोन्ही भावनांनी युक्त असते.
कानेटकरांची भाषा प्रगल्भ आहे. त्यांना रंगमंचाची उत्तम जाण होती. इतिहासांचा त्यांचा अभ्यास वाखणण्याजोगा आहे. जे सर्व नेपथ्यातून सांगता येत नाही तेथे शब्दचित्र प्रकट करणे महत्वाचे असे ते मानत. ते खऱया अर्थाने नाटय़तंत्रकार होते, असेही त्या म्हणाल्या.
याच कार्यक्रमात अभिनेत्री शुभांगी दामले यांनी अभिवाचन करताना नाटकाच्या संहितेची निवड महत्वाची आहे. ऑनलाईन अभिवाचन स्पर्धेसाठी कमीतकमी पात्रे असणारी संहिता उचित ठरते. पुरूष पात्र असेल तर आवाजात थोडा फार बदल केला जावा, असे सांगितले. या स्पर्धेचे परीक्षणही त्यांनीच केले होते. यावेळी विद्या याळगी यांनी आपले काका म्हणजेच वसंत कानेटकर यांच्या कौटुंबिय काठवणी सांगितल्या व पत्नी सिंधूताई यांची त्यांना सुंदर साथ लाभल्याचे सांगितले.
प्रारंभी प्रा. माधुरी शानभाग यांनी सर्वांचे स्वागत केले. संगीता बांदेकर यांनी नांदी व कानेटकरांच्या नाटकातील दोन नाटय़गीते सादर केली. प्रा. अरुणा नाईक यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. तत्पूर्वी डॉ. अशोक साठे यांनी दीपप्रज्वलन केले व कार्यक्रमाचे उद्घाटन केले व शारदोत्सवाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला राज्य मराठी विकास संस्थेचे अर्थ सहाय्य लाभले होते. निर्मला कळ्ळीमनी यांनी सर्वांचे आभार मानले.
या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे…
- 1) सुरेखा भावे (प्रेमा तुझा रंग कसा?)
- 2)प्रिया काळे (सुर्याची पिल्ले)
- 3) धनश्री मुचंडी (प्रिय आईस)
या शिवाय उत्तेजनार्थ क्रमांक प्रियांका केळकर (इथे ओशाळला मृत्यू), नीना जठार (सुख पाहता), आरती आपटे (तुझा तू वाढवी राजा), मौसमी भातकांडे (हिमालयाची सावली) यांना देण्यात आला.