प्रतिनिधी/ पणजी
पूर्वी संपूर्ण जगाला आपले एक कुटुंब समजणारे तत्त्वज्ञान वसुधैव कुटुंबकम मानत असू, मात्र आता तर खरोखरचे कुटुंब देखील कुटुंब समजले जात नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे चित्र बदलण्यासाठी आपल्याला रॅट रेसमधून जीवघेण्या स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल, आनंदी रहावे लागेल आणि आपण एकमेकांना मदत केली तरच आपणही सुखी होऊ शकतो, हे सत्य समजून घ्यावे लागेल असा भावनिक संदेश प्रवास या चित्रपटातून देण्यात आला आहे अशी माहिती प्रवास चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक उदापूरकर यांनी 51व्या आंचिममध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
हा चित्रपट आयुष्याचा प्रवास सांगणारा आहे त्याचवेळी तो मानवी भावविश्वातल्या महत्त्वाच्या गोष्टींवरही भाष्य करतो. प्रतिष्ठित युनेस्को गांधी पदकासाठी देखील हा चित्रपट स्पर्धेत आहे. प्रवास चित्रपटात अभिजात ईनामदार आणि त्यांची पत्नी लता या जोडप्याची कथा सांगण्यात आली आहे. अभिजात आता साठीत असून त्यांची प्रकृतीही चांगली नाही. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असून जगण्यासाठी त्यांना डायलेसीसचाच आधार आहे. त्यांना आयुष्यातल्या अनेक गोष्टींबद्दल खंत वाटते आणि आयुष्य जवळपास संपलेललेच आहे अशी त्यांची भावना झाली आहे. लतानेही परिस्थितीपुळे हार मानली आहे. मात्र एक दिवस त्यांना अंतः प्रेरणेतून काहीतरी जाणीव होते आणि तिथेच त्यांच्या आयुष्याच्या एका नव्या टप्प्याची सुरूवात होते.
या चित्रपटामुळे आपल्या सर्वांनाच जाणीव होते की आपल्याला या पृथ्वीवर जगण्यासाठी मर्यादित वेळ मिळाला आहे आणि म्हणूनच आपण आपले आयुष्य कसे जगतो हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कथानायक अभिजातची कथा, तुम्हा आम्हा सर्वांची कथा आहे. जेव्हा आपण इतरांना मदत करतो आणि आपले आयुष्य अर्थपूर्ण रीतीने जगतो तेव्हा आपण पृथ्वीवरचे सर्वात आनंदी व्यक्ती असतो. आपण फक्त आपल्या हृदयाचे ठोक ऐकले पाहिजेत असे उदापूरकर यांनी यावेळी सांगितले.