आतापर्यंत राज्यात 125 इंच पावसाची नोंद
प्रतिनिधी /पणजी
कायद्यानुसार व नियमानुसार आज गुरुवारी मान्सूनचा अखेरचा दिवस आहे. गेल्या 24 तासांत पावसाने गोव्याला झोडपून काढले असून आजच्या अखेरच्या दिनी राज्यात तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. यंदाच्या मौसमात दि. 29 सप्टेंबर पर्यंत राज्यात 125 इंच पाऊस पडला असून सरासरीच्या तुलनेत तो 6 इंचांनी जास्त आहे.
राज्यात मागील 48 तासात सर्वत्र मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे. दक्षिण गोव्याच्या तुलनेत उत्तर गोव्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. पणजीला देखील बुधवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत झोडपून काढले. पावणेदोन इंच पावसाची नोंद झाली. मान्सून आज अधिकृतपणे निरोप घेणार आहे, उद्यापासून पडणारा पाऊस हा मान्सूनोत्तर पाऊस गणला जाणार आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाची नोंद त्यातुलने कमी झाली. दि. 29 सप्टेंबर पर्यंत 125 इंच पाऊस नोंदविला गेला. यात दि. 15 मे ते 31 मे दरम्यान 15 दिवस कोसळलेल्या पावसाची नोंद करण्यात आलेली नाही. मान्सून आज अधिकृतरित्या संपुष्टात येत असला तरी अद्याप परतीच्या पावसाला सुरुवात झालेली नाही.
गेल्या 24 तासात राज्यात पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे ः म्हापसा 2.25 इंच, पेडणे अर्धा इंच, फोंडा 2 इंच, पणजी 1.75 इंच, जुने गोवे 2 इंच, साखळी 2.50 इंच, वाळपई 1.75 इंच, काणकोण 2 इंच, दाबोळी 1.75 इंच, मुरगाव 1.50 इंच, केपे 1.75 इंच, सांगे 1.75 इंच.
यंदा सर्वाधिक पाऊस पेडणेत
यंदाच्या वर्षी सर्वाधिक पावसाची नोंद पेडणेत झाली. तिथे आतापर्यंत 164 इंच एवढी विक्रमी पावसाची नोंद झाली. दरम्यान पणजीत बुधवारपासून सायंकाळी पर्यंत पावणेदोन इंच पावसाची नोंद झाली.