शेतकऱयांच्या प्रयत्नाने वणवा विझवला
वार्ताहर/ संगमेश्वर
संगमेश्वर जवळच्या माभळे येथे लागलेल्या वणव्यामुळे पाच एकरावरील काजू,आंबा तसेच इतर झाडे जळून खाक झाले आहेत. तर वणव्यांमुळे शेतीच्या भाजावळीसाठी शेतात ठेवलेले सामान जळून खाक झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. दुपारच्या दरम्याने लागलेल्या वणव्यामुळे बागायतदार त्रस्त झालेत.
माभळे व उजगांव धनगरवाडा येथील सडया भागातील वणव्यामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. दरवर्षी काजू व आंब्यांच्या बागात वणव्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागते. दोन वर्षापूर्वी लागलेल्या वणव्यात श्री भोजने यांच्या घराचेही नुकसान झाले होते. मात्र घरातील आई व छोटी मुलगी बालंबाल बचावली होती. काही दिवसापूर्वी लागलेल्या वणव्याच्या झळा माभळे व उजगांवातील शेती बागायतदारांना बसल्या. अचानक लागलेल्या वणव्यामुळे वृक्ष उन्मळून पडले होते.
दुपारी 12 वा.दरम्याने धनगरवाडय़ाजवळ लागलेली आगीचे वणव्यामध्ये रुपांत्तर झाले. दुपारच्या दरम्याने लागलेल्या वणव्यामुळे बागायतदारांची झोपच उडाली. आग विझविण्यासाठी अनेकांनी माभळे सडा भागावर धाव घेतली. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर आग विझविण्यात यश आले. सडा भागात लागणाऱया वणव्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे.