प्रतिनिधी/मिरज
शहरातील महापालिका पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. कर्मचाऱ्यांना मारहाण होताच त्यांचे मनोबल वाढवून त्यांना न्याय मिळवून देण्याची गरज असताना विभागप्रमुख पांडव हे पळून गेल्याचा आरोप यावेळी निदर्शन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केला. याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महापालिका पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला दोन दिवसांपूर्वी या परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने मारहाण करून जखमी केले होते. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडून लोकांना माहिती देण्यात आली होती. वास्तविक कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या घटनेनंतर पोलिसात तक्रार देऊन संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता होती. मात्र विभाग प्रमुख पांडव हे कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून तेथून पळून गेले. त्याच्या निषेधार्थ मंगळवारी पाणीपुरवठा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी पाणी पुरवठा विभागासमोर निदर्शने करत कामबंद आंदोलन केले. त्यानंतर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना मागणीचे निवेदन देऊन संबंधित तरुणावर तसेच विभागप्रमुख पांढरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.