मार्चअखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचा ठेकाधारक कंपनीचा मानस
प्रतिनिधी / खेड
जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या व कोकणाची ‘लाईफलाईन’ म्हणून समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील भरणे येथील नवा जगबुडी पूल गतवर्षी ऑगस्टपासून वाहतुकीस खुला झाल्याने वाहनचालकांची चिंता कायमचीच मिटली आहे. यापाठोपाठच नव्या पुलाच्या बाजुलाच दुसरा पूल उभारण्याचे काम देखील ठेकाधारक कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने आठवडाभरापासून हाती घेतले आहे. या पुलाचे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचा कंपनीचा मानस असून त्यानुसार कामाला गती देण्यात आली आहे. हा पूल वाहतुकीस खुला झाल्यानंतर प्रवास आणखी सुखकर होण्यास मदत होणार आहे.
भरणे येथील जगबुडी नदीवर ब्रिटिशकालीन म्हणजेच १९३१ च्या सालात मुंबई गोवा महामार्गावर अपघाताच्या दृष्टीने संवेदनशील बनलेला दीडशे वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन पूल महामार्गावरील वाहतुकीसाठी मानबिंदूच ठरला होता. मात्र, या पुलाच्या बांधकामाची मुदत संपुष्टात आल्यानंतर हा पूल राज्यातील धोकादायक स्थितीतील पुलांच्या यादीत समाविष्ट झाला होता. डेंजरझोनमध्ये गेलेल्या जुन्या जगबुडी पुलावरून वाहने हाकताना जीव मुठीत धरूनच मार्गस्थ व्हावे लागत होते.
या पुलावर महाकाली आरामबसला झालेल्या अपघातात ३७ जणांचा हकनाक प्राण गेल्यानंतर पुलाची डागडुजी ऐरणीवर आली होती. यानंतरच नव्या जगबुडी पुलासाठी ८ कोटी रूपयांच्या निधीची उपलब्धतता करून देण्यास प्रशासनाला जाग आली. हा निधी उपलब्ध झाल्यानंतर नव्या जगबुडी पुलाचे काम हाती घेण्यात आले. जगबुडी नदीच्या डाव्या बाजूस नदीच्या पात्रापासून ९ मीटर अंतरापर्यंत दुपदरी पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, या दुपदरी पुलाचे काम तीन वर्षे रखडल्याने यातायातच सुरू झाली होती.
अखेर खवटीपासून परशुराम घाटापर्यंतच्या चौपदरीकरण कामाचा ठेका घेतलेल्या कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने नव्या जगबुडी पुलाची गतीने उभारणी केली. गतवर्षी १७ ऑगस्टपासून नवा जगबुडी पूल वाहतुकीस खुला झाल्यानंतर जुन्या जगबुडी पुलावरील वाहतुकीला ब्रेक लागला. नवा जगबुडी पूल वाहतुकीस खुला झाल्यापासून वाहनचालकांची यातायात कायमचीच थांबली आहे. नवा जगबुडी पूल वाहतुकीस खुला झालेला असतानाच ठेकाधारक कंपनीने रखलडलेल्या दुसऱ्या पुलाचे काम हाती घेतले आहे.
गेल्या आठवडाभरापासून नव्या जगबुडी पुलाच्या बाजुलाच बांधण्यात येत असलेल्या दुसऱ्या पुलाच्या कामासाठी यंत्रणा तैनात करण्यात आली असून दिवस – रात्र काम सुरू झाले आहे. दुसऱ्या पुलाचे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने ठेकाधारक कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने कंबर कसली आहे. हा पूल वाहतुकीस खुला झाल्यानंतर महामार्गावरून धावणाऱ्या वाहनचालकांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. याशिवाय या नव्या पुलामुळे अपघातांना देखील आळा बसणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.