जिल्हय़ात शेतीच्या कामांना प्रारंभ
प्रतिनिधी/ रत्नागिरी
महाराष्ट्रात अजूनही मॉन्सूनच्या आगमनाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. सद्या पूर्व मोसमी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. रत्नागिरीत सोमवारी पहाटेपासून सकाळपर्यंत ठिकठिकाणी धुवाँधार बसरसात झाली. आता तर सोमवारपासून मृग नक्षत्रालाही प्रारंभ झाल्याने या नक्षत्रात जोरदार पावसाला प्रारंभ होत असल्याचा पूर्वापार अंदाज व्यक्त केला जातो. त्यामुळे या पूर्वमोसमी पावसाच्या कोसळणाऱया पावसाच्या सरींमुळे जिल्हय़ातील शेतकरी सुखावून गेला असून खरीपाच्या पेरणीनंतर आता शेतीच्या कामांना वेग आला आहे.
कोकण किनारपट्टीला 3 जून रोजी ‘निसर्ग’ चक्रीवादळाने तडाखा दिला. या वादळाबरोबरच जिल्हाभरात मुसळधार पाऊस बरसला. या पावसाच्या आगमनामुळे जिल्हय़ातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला. वादळाने नुकसान केलं पण त्याच्याबरोबर पडलेल्या पावसाने नांगरणी पुरती जमीन ओली केली. त्यामुळे कोकणातील शेतकरी वादळातल नुकसान विसरत आता शेतीच्या कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे. हा पाऊस जरी पूर्वमोसमी असला तरी लवकरच खऱया मान्सूनचे आगमन होणार असल्याने शेतीच्या कामांना लागोलाग प्रारंभ करण्यात आला आहे. खरीपाच्या पेरणीच्या कामांना सुरूवात होऊन ती आटोपण्याकडे शेतकरीवर्ग गुंतला आहे. अनेक ठिकाणी पेरणीची कामे आटपून शेतजमिनीची फोड नांगरणी करण्याच्या कामांनी वेग घेतलेला आहे.
दक्षिण भारतात मॉन्सूनचे आगमन झालेले आहे. मात्र या आठवडय़ाच्या मध्यातून महाराष्ट्र तसेच मध्य भारतात मुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता स्कायमेट या हवामान संस्थेने वर्तवली आहे. मुंबईसह कोकण-गोवा भागातही या आठवडय़ात मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागांमध्ये 12 ते 14 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी 8 जूनपासून मृग (मिरग) नक्षत्राला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे या नक्षत्रापासून पाऊस सर्वत्र जोर धरण्याची आशा शेतकरीवर्गातून वर्तवली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्य़ात जूनच्या प्रारंभापासून 8 जूनच्या सकाळपर्यंत सरासरी 224.22 सरासरी इतके पर्जन्यमान झालेले आहे. तर हेच पर्जन्यमान गतवर्षी 2019 मध्ये फक्त 0.67 सरासरी इतके झालेले होते. त्यामुळे यावर्षी जिल्ह्य़ात पर्जन्यमानाची सुरूवात समाधानकारक झाल्याचे सांगितले जात आहे.