प्रतिनिधी / मिरज
भंडारा येथे शासकीय रुग्णालयात झालेल्या अग्नितांडवात १० निष्पाप बालकांचा बळी गेल्याची घटना घडल्याने राज्य हादरून गेले आहे. तर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. भंडारा येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि मनपा रुग्णालयात फायर ऑडिट करावे, मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
भाजपचे जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, शहराध्यक्ष बाबासाहेब आळतेकर यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे डॉ. गुरव यांच्याकडे निवेदन दिले. मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालय हे जिह्यातील महत्वाचे रुग्णालय असून, जिल्ह्यासह लगतच्या कर्नाटक राज्यातून देखील याठिकाणी रुग्ण तपासणीसाठी मोठ्या संख्येने येत असतात. तसेच वेगवेगळ्या विभागात उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांची संख्याही खूप असते. याशिवाय मनपाच्या रुग्णालयातही मोठ्या संख्येने रुग्ण उपचार घेत असतात. भंडारा येथील दुर्घटनेचा विचार करता आता या रुग्णालयांचेही फायर ऑडीट करावे, रुग्णालयात अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा तातडीने बसवून घ्यावी व रुग्णांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.