ओटवणे /प्रतिनिधी-
तेरेखोल नदीच्या पुरामुळे घर जमिनदोस्त झालेल्या ओटवणे येथील विठोबा न्हानू वरेकर आणि विलवडे येथील अर्चना गुळेकर या दोन कुटुंबांना मुंबई येथील श्री शिवशंभू ५९९४ ग्रुप यांच्या माध्यमातून गृहपयोगी सर्व वस्तूंचे वितरण करण्यात आले. त्यामुळे या दोन्ही कुटुंबांना त्यांचा जमिनदोस्त झालेला संसार पुन्हा मिळाला.
मुंबई येथील या श्री शिवशंभु ५९९४ ग्रुपने सुरवातीला चिपळूण आणि सावंतवाडी तालुक्यातील पूरग्रस्तांना अन्नधान्य व पाणी देऊन या पूरग्रस्ताची प्रथम तहान भूक सावरली होती. त्यानंतर पुरात घर जमिनदोस्त झालेल्या पूरग्रस्तांना त्यांचा गेलेला संसार परत उभा करून देण्यासाठी या ग्रुपने मुंबईतून पुन्हा दुसऱ्यांदा सावंतवाडी गाठून या दोन कुटुंबियांना संसारोपयोगी वस्तू देऊन जमिनदोस्त झालेला या दोन कुटुंबियांचा संसार उभा करून दिला. त्यामुळे पुरात उध्वस्त झालेली ही दोन्ही कुटुंबे भारावून गेली. या दोन्ही कुटुंबियांनी या शिवशंभू ग्रुपचे आभार मानले.
या दोन्ही कुटुंबांना टेबल फॅन, मिक्सर, कुकर, गॅस शेगडी, सर्व प्रकारची भांडी, खुर्च्या, टेबल, टी पॉय, प्लास्टिक वस्तू, इलेक्ट्रीक बल्ब, ट्यूब यांसह बेडशीट, ब्लँकेट, देव्हारा व श्री स्वामी समर्थांची प्रतिमा आदी वस्तू देण्यात आल्या.
यावेळी श्री शिवशंभू ग्रुपचे पदाधिकारी रितेश चव्हाण, सूरज तलार, रोहन ठक्कर, साहिल भातडे, दिनेश ढोके, ज्योतीराम पवार, उमेश जाधव पत्रकार सचिन रेडकर आदी उपस्थित होते.