ऑनलाईन टीम / मुंबई :
सोमवारी अचानक मुंबई आणि उपनगरातील बत्ती गुल झाली होती. याप्रकरणी महविकास आघाडी सरकारला विरोधकांकडून लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी एक खळबजनक दावा केला आहे. या संदर्भात काल रात्री उशिरा एक ट्विट केले.
सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असे ट्विट केले आहे.
दरम्यान, 12 ऑक्टोबरला सकाळच्या सुमारास संपूर्ण मुंबई आणि उपनगरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यानंतर टप्प्या टप्प्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र याकाळात वीज पुरवठ्यावर अवलंबून असलेल्या सेवांना याचा चांगलाच फटका बसला.
या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनीही तातडीची बैठक घेत घटनेचा आढावा घेतला. तर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. मात्र ऊर्जामंत्र्यांनी केलेल्या ट्विटनंतर आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.