- विना मास्क बस, टॅक्सी, रिक्षात प्रवेश नाही
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. त्यात मुंबईत रूग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून शहरातील नियम अधिक कडक केले आहेत.
‘विना मास्क’ विषयक जनजागृती करतानाच दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महापालिकेच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान दिले.
या अंतर्गत मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालये, आस्थापना, मॉल्स, सोसायटी, सभागृह इत्यादी ठिकाणी ‘मास्क नाही, प्रवेश नाही’; ‘नो मास्क, नो एन्ट्री’ अशा आशयाचे फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर सर्व बसेस, टॅक्सी, रिक्षांदेखील याच आशयाचे स्टीकर्स लावण्याचे निर्देश देण्यात आले असून, या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
तोंड व नाक योग्यप्रकारे झाकले जाईल, अशाप्रकारे मास्क अर्थात मुखपट्टीचा वापर करणे, हा करोना या संसर्गजन्य आजाराला प्रतिबंध करण्याचा सर्वांत प्रभावी उपाय असल्याचे आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रातील जगभरातील तज्ज्ञांनी वेळोवेळी सांगितले आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातदेखील नागरिकांद्वारे मास्कचा सुयोग्य व परिपूर्ण वापर व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महापालिका सातत्याने जनजागृतीपर कार्यवाही करीत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी मास्क योग्यप्रकारे परिधान न करणाऱ्यांकडून 200 रूपयांचा दंड आकारण्यासही सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान, ही कारवाई अधिक व्यापक व अधिक तीव्र करण्याचे आदेशही महापालिका आयुक्तांनी बैठकीदरम्यान दिले.
यानुसार आता लवकरच महापालिका क्षेत्रातील कार्यालये, आस्थापना, मॉल्स, सोसायटी, सभागृह इत्यादी ठिकाणी निर्देश फलक बसविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ सुरु करण्यासही सांगण्यात आले आहे. त्या बरोबरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील रिक्षा, बसेस, टॅक्सी आदींवर मास्क नसल्यास प्रवेश नाही अशा आशयाचा मजकूर असणारे स्टिकर्स लावण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.