प्रतिनिधी/ मुंबई
गत दोन दिवसांपासून बरसणाऱया पावसाने शनिवारी रात्री आपले उग्र रुप दाखवले. रात्री मुसळधार पावसाचा जोर वाढल्याने विविध दुर्घटनांमुळे हाहाकार उडाला. चेंबूर, भांडुप व विक्रोळी अशा तीन ठिकाणी दरड, भिंत व घरे कोसळून तसेच अंधेरीत शॉक लागून झालेल्या दुर्घटनेत 25 जणांचा मृत्यू झाला. तर 4 जण जखमी झाले. या घटनांमुळे राज्यासह देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून मदत जाहीर केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करुन शोक व्यक्त केला.
घटनांची अधिक माहिती अशी, चेंबूर, भारतनगर येथे घरावर संरक्षक भिंत, दरड कोसळून 18 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले. तर चौघांसह ढिगाऱयाखाली अडकलेल्यांचा शोध एनडीआरएफ व अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहे. तर विक्रोळी, सूर्यनगर येथे घरांवर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाले. तसेच, भांडुप येथेही घराची पडझड होऊन सोहम महादेव थोरात (16) या मुलाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. तर पवई, चांदीवली येथे दरड कोसळून 2 जण जखमी झालेत. या दुर्घटनांच्या ठिकाणी उशिरापर्यंत ढिगारा उपसण्याचे व बचावकार्य, शोधकार्य सुरू होते. अंधेरी येथेही विजेचा झटका लागून 26 वर्षी तरुणाचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळपर्यंत मुंबईत पावसाचे 25 बळी ठरले तर चौघे जखमी झाले.
मुंबईत घडलेल्या विविध घटनास्थळी मंत्री नवाब मलिक, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार सुनील राऊत आदींनी भेट दिली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या दुर्घटनांबाबत दुःख व्यक्त केले. मात्र, मुंबई महापालिका दरवर्षी डोंगराळ भागात, धोकादायक इमारतींमध्ये, भिंतीजवळ राहणाऱया नागरिकांना धोक्याचा पूर्व इशारा देते, असे महापौरांनी सांगितले. यासंदर्भात नोटिसाही दिल्या असतात.
पंतप्रधानांकडून शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर जखमींवर रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येत आहेत.
आदित्य ठाकरेंकडून पाहणी
मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनीही चेंबूर येथील घटनास्थळी पाहणी केली. दुर्घटनास्थळी धोकादायक अवस्थेत असलेल्या घरांचे इतरत्र स्थलांतर करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. मिठी नदीची पातळी वाढल्याने तेथेही किनाऱयावरील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.